Goa Liberation
Goa Liberation Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Liberation: गेल्‍या 60 वर्षांत आम्‍ही गोवा गमावला! बहुतांश स्‍वातंत्र्यसैनिक नाखूश

दैनिक गोमन्तक, Avit Bagle

Goa Liberation: गोवा मुक्तीवेळी प्रत्येकाच्‍या मनात अनेक आशा-आकांक्षा होत्या. मागे वळू पाहताना त्या पूर्ण झाल्या काय, याचा मनाशी हिशेब करताना हाती काहीच गवसले नसल्याचे जाणवते. एवढेच नव्हे पूर्वीचा गोवाही हरवून टाकला आहे. त्‍यामुळे बहुतांश स्वातंत्र्यसैनिक आज खूष नाहीत, असे मला सांगण्यात आले आहे, असे ज्‍येष्‍ठ स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पोर्तुगीजांची राजकीय मते वेगळी असली तरी समाजजीवनात त्यांचे वावरणे वेगळे होते. त्यांच्या काळात घराला कुलूप लावल्यानंतर किल्ली तेथेच असलेल्या एखाद्या झरोक्यात ठेवून लोक बाहेर जायचे. तेवढी सुरक्षितता त्यांना वाटे. शांतताही तेवढीच होती. पंधरा वर्षात एखादा खून असे गुन्हेगारीचे चित्र होते.

गोवा मुक्तीनंतर चित्र पालटत गेले. विकास म्हणा किंवा प्रगती म्हणा, ती झाली पण शांतता हरवली. सुरक्षितता कुठे लुप्त झाली हे समजलेच नाही. आता दाराला कुलूप लावून किल्ली पर्समध्ये टाकून बाहेर गेल्यावरही घर सुरक्षित राहील की नाही याविषयी धास्ती वाटू लागली आहे. 60 वर्षात आम्ही काय कमावले याचा विचार केला तर असलेला गोवा आम्ही हरवून बसलो आहोत हेच जाणवत राहते, असे सरदेसाई म्‍हणाल्‍या.

गोवा मुक्तिनंतर गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेल्यांचे म्हणणे जाणून घेणे कोणत्याही सत्ताधाऱ्याला आवश्यक वाटले नाही अशी खंत व्यक्त करून सरदेसाई म्‍हणाल्‍या की, आम्हाला ही खुर्ची कशी मिळाली हे आताच्या सत्ताधाऱ्यांना ठाऊक नसेल. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय लष्कराने गोवा मुक्त केले आहे.

एखादी मोटार एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता असावा लागतो. तसा रस्ता तयार करण्याचे काम स्वातंत्र्यसैनिकांनी केले होते. मात्र नंतरच्या काळात त्याची दखल सर्वच पातळीवर घेतली गेली नाही. गोवा मुक्तिनंतर त्यांची गरज सरावी असे चित्र तयार झाले. आजही ते कायम आहे, अशी खंत लिबिया लोबो सरदेसाई यांनी व्‍यक्त केली.

मी मुंबईत शिक्षणासाठी गेले होते. धोबीतलाव परिसरात राहत होते. तेथे जयहिंदवाले येत. त्यांच्यावर घोडेस्वार पोलिस लाठीमार करत आणि इस्पितळात आणत. ते असे का वागतात असे पंधरा वर्षांत मला वाटत असे. त्यातून देश स्वातंत्र्य करण्यासाठी ते असे वागत असल्याचे समजत असे. आमचा गोवाही पोर्तुगीजांनी बळकावला होता. तो मुक्त कऱण्यासाठी आम्हीही काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. तेथूनच पुढे चळवळीत ओढले गेले, असे सरदेसाई म्हणाल्या.

ब्रिटिश भारतात काही प्रमाणात लोकशाही होती. नेते इंग्लंडमध्ये शिकून ब्रिटिशांविरोधात लढत होते. हे स्वातंत्र्य पोर्तुगीज गोव्यात नव्हते. त्यामुळे गोवा मुक्तीनंतर हे स्वातंत्र्य येथील लोकांना मिळेल असे वाटत होते. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. पुढे १९६१ मध्ये गोव्याला मुक्ती मिळाली. पण भारतातील चांगल्या गोष्टी येथे आल्याच नाहीत. येथे वाईट गोष्टी आल्या असे म्हणायचे नाही, पण अपेक्षापूर्ती झाली नाही हेही तितकेच खरे आहे, असे लिबिया लोबो सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT