नरकासुरा रे, नरकासुरा  Dainik Gomantak
ब्लॉग

नरकासुरा रे, नरकासुरा

दैनिक गोमन्तक

उद्या पहाटे ते जाळले जाणार असले तरी आजची रात्र नरकासुरांचीच आहे. गोव्यात शहरोशहरी आयोजित होणाऱ्या ‘नरकासुर स्पर्धा’ गेली दोन वर्षे त्याना चुकलेल्या असल्या तरी त्यांचा थाटमाट काही कमी झालेला नाही. उलट यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्यामुळे त्यांचे ‘सिक्स पॅक्स’ अधिकच भरदार झालेले असतील.

मागच्या कित्येक रात्रींमधून ते हळूहळू आकार घेत आहेत. दिवसाच्या उजेडात ते झाकून राहिले तरी अंधार पडायला लागल्यावर मात्र त्यांच्या सांगाड्याभोवती तरुणाईचे कोंडाळे एकेक करून जमा व्हायला लागते आणि त्यांच्या सांगाड्यात स्नायू आकार घ्यायला लागतात.

मुळातच भारतात इतरत्र कुठेही नसलेले नरकासुर गोव्यातच कसे काय अमाप संख्येने माजलेले दिसतात? ही प्रथा आहे की आंधळी लहर? गोव्याच्या मुक्तिपूर्व काळातली पिढी म्हणते, त्या काळी असले काही नव्हते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे पायांखाली कारिटाचे फळ तुडवले की झाला नरकासुराचा वध. त्यानंतर अभ्यंगस्नान करून, गोडधोड खाऊन दिवाळीच्या उल्हसित दिवसाला सुरुवात व्हायची.

त्यानंतरच्या पिढीने त्यांच्या बालपणात, अवतीभवतीची मुले जमवून नरकासुराच्या प्रतिमा बनवायला सुरुवात केली. भात शेती आटोपलेली असायची. सुकलेले गवत आयतेच हाताशी असायचे. मग त्यातून ओबड-धोबड राक्षसी प्रतिमा तयार व्हायची. त्या वेळी बाजारात आताच्यासारखे मुखवटेही मिळत नसायचे. रंग वापरून नरकासुराचे राक्षसी चेहरे रंगवले जायचे. त्यांचे केस, सुळे इत्यादी हातांशी असलेल्या चिंध्यामधूनच निर्माण व्हायचे आणि मग नरक चतुर्दशीच्या पहाटे या नरकासुराची मिरवणूक डबे वगैरे वाजवत पायीच निघायची. ‘हो नरकासुर कोणाचो?’ या आरोळीवजा प्रश्नाला, सोबत असलेल्या इतरांनी दिलेल्या घोषवजा उत्तरातून, तो नरकासुर कुठल्या वाड्यावरचा हे शेजारा-पाजाराला कळायचे. ही मिरवणूक मग वाजत गाजत पूर्वस्थळी परतायची आणि मग मोठ्या विरश्रीच्या अविर्भावात त्याचे दहन केले जायचे.

पण ही फार पूर्वीची गोष्ट झाली. साधारण सत्तरच्या दशकाच्या अखेरपर्यंत नरकासुर एका मर्यादेतच होते. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे सरकारीकरण झाले- नरकासुर स्पर्धा सुरू झाल्या. आणि त्यानंतर नरकासुराने अधिकच उग्ररूप धारण करायला सुरुवात केली. ते अधिकाधिक उंच आणि धिप्पाड बनू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या क्रौर्यात अधिकाधिक अस्सलपणा यावा यासाठी नरकासुर मंडळ धडपडू लागले. आपापले नरकासुर घेऊन पहाटे गावभर वेळ फेरफटका मारणाऱ्यांनी आता आपले नरकासुराने स्पर्धेत दाखल केले आणि गावातला फेरफटका संपलाच.

पूर्वी नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री आपापला नरकासुर रंगवून झाल्यानंतर मंडळी झोपायला जायची आणि दिवाळीच्या प्रथेप्रमाणे पहाटे उठून नरकासुराचे दहन करायची. हा क्रम आता बदलला होता. स्पर्धेसाठी रात्रभर जागरणे घडू लागली. एक स्पर्धा आटोपली की नरकासुर दुसऱ्या स्पर्धेसाठी रवाना व्हायला लागले. ज्या स्पर्धेत बक्षिसाची रक्कम मोठी ती स्पर्धा अधिक लालचावणारी असायची. मग रात्रभर नरकासुराबरोबर नाचून पहाटे घरी यायचा परिक्रम सुरू झाला. त्यानंतर झोपी जाणे होऊ लागले मग पूर्वी पहाटे-पहाटे होणारे अभ्यंग स्नान सूर्य कासरभर वर आल्यावरच घडू लागले.

कुठलाही धार्मिक संदर्भ नसला तरी गोव्यात कार्निवल आणि नरकासुर हे अगदी धूमधडाक्यात साजरे केले जातात. कार्निवलप्रमाणेच गोव्याचे नरकासुरही आता देशात इतके प्रख्यात आहेत की ते पाहायला पर्यटकांचीही गर्दी होते. अशाच एका पर्यटकाचा ब्लॉग ‘गोवा हॉलिडे होम डॉट कॉम’वर आहे. त्यात तो म्हणतो, ‘प्राचीन काळी नरकासुर या राक्षसाचे राज्य गोव्यावर होते!’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT