समुदायाचे सुंदरत्व राखणाऱ्या रूढी- परंपरा

गोवा मुक्तीपुर्वीच्या काळात डोंगर-दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारा, मुक्त नैसर्गिक वातावरणात जगणारा धनगर समाज विकासाच्या रेट्यात आणि जंगल भागांवर शासनाचे कायदे अंमलात आल्याने स्थलांतरीत झाला
समुदायाचे सुंदरत्व राखणाऱ्या रूढी- परंपरा
समुदायाचे सुंदरत्व राखणाऱ्या रूढी- परंपराDainik Gomantk
Published on
Updated on

वर्तमान काळात झपाट्याने बदलत चालणाऱ्या या जगात लक्षणीय बदल घडून येत असले तरी गोव्यातील धनगर या आदिम समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, भाषा, वेशभूषा आणि रितीरीवाजांकडे पाहील्यास, या समाजाने या झपाट्याने बदलणाऱ्या काळातसुद्धा आपल्या परंपरांची जोपासना अतिशय सुंदरतऱ्हेने केलेली दिसते. गोवा मुक्तीपुर्वीच्या काळात डोंगर-दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारा, मुक्त नैसर्गिक वातावरणात जगणारा धनगर समाज विकासाच्या रेट्यात आणि जंगल भागांवर शासनाचे कायदे अंमलात आल्याने स्थलांतरीत झाला. त्यामुळे या समाजाच्या सांस्कृतिक परंपराना किंचित धक्का पोचला तरी आजही त्यांच्या जीवनशैलीमधून आणि या समाजात संपन्न होणाऱ्या विधींवरून बदलत्या काळाचा रेटा त्यानी पचवला आहे हे जाणवते.

पुर्वीच्या काळापासून गायी म्हशींच्या दुधाचा व्यवसाय करून आपल्या संसाराचा गाडा हाकीत असलेल्या या समाजात दुधापासून दही, ताक, लोणी व त्यापासून तुप काढण्याची पद्धत आजही तशीच कायम आहे, सध्या गोठ्यातले जनावरांचे प्रमाण कमी झाले असले तरी सणासुदीच्या वेळी दही, ताक, लोणी तयार करण्याची जबाबदारी महीला वर्ग पुर्वीसारख्याच घेतात. धनगर समाजात प्राचिन काळापासून काही रिवाज रात्री साजरे करण्याची परंपरा आहे. पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा वापर करून साजरे होणाऱ्या अशा सणात आदिवासी पंरपरेची झलक दिसते. यातील एक परंपरा म्हणजे ‘दुडगा’. दुडगा म्हणजे मातीचे छोटे मडके, धनगर समाजात दसरा किंवा पंढरीच्या पव्याच्या आयोजनात दही ताकाने दुडगा भरला जातो. दुडग्याची पारंपरिक पद्धतीने पुजा करुन त्यांचे विसर्जन केले जाते. दसऱ्याच्या वेळी दुडग्याचे विसर्जन सार्वजनिकरित्या मांडावर केले जाते तर पंढरीच्या पव्यावेळी या दुडग्याचे विसर्जन आपट्याच्या पानांचे सोने लुटताना केले जाते.

धनगर समाजात असलेली ‘ईसावा’ ही रुढीही विलक्षण आहे. समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने ‘ईसावा’ म्हणून दगड पुजण्यात येतो. त्याला स्मशानभूमीत आणल्यानंतर काही विधी करून झाल्यानंतर तो मृतदेह जमीनीत पुरण्याआधी किंवा त्यला अग्नी देण्याअगोदर त्या व्यक्तीच्या नावाने एक चांगला निवडलेला दगड आणून स्मशान भूमीत नियोजित जागेवर, ठेवला जातो, काही ठिकाणी हा दगड त्याच दिवशी ठेवतात तर दुसऱ्या काही भागातल्या रिवाजानुसार तो तीन दिवसांनी ठेवला जातो, परंतू एकदा निवडलेला दगड हा त्या जागेवर ठेवेपर्यंत तो जमिनीवर न ठेवता एका झाडावर ठेवला जातो, आणि मग तो दगड तीन दिवसांनी त्या मृत व्यक्तीच्या कुटुंब व इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत इतर ईसावे ठेवलेल्या जागी स्थापन केला जातो. त्याची पाणी , खोबरेल तेल, हळद, पिंजर, फुले वाहून व अगरबत्ती लावून पुजा केली जाते. काही भागात हा दगड आपल्या घरी नेऊन व तो अंगणात ठेऊन तेथे त्याची पुजा केली जाते.

धनगर समाजात रूढ झालेल्या परंपरेनुसार स्मशानभूमीतील ईसाव्याना, वर्षांतून एकदा, दसऱ्याची सांगता झालेल्या दिवशी देवाचा नैवेद्य दाखवला जातो. मृत्य झालेल्या घरातील जाणती व्यक्ती नैवेद्य, नारळ, गुळ, पाणी, अगरबत्ती, पान सुपारी, तंबाखू, आदी वस्तू घेऊन स्मशानभूमीतील ईसाव्या जवळ जाऊन त्यांना कुंड्याच्या पानावर नैवेद्य दाखवतात. या वेळी ईसाव्यावर फुले वाहिली जातात. अशा प्रकारे धनगर समाजात आजही आपल्या पुर्वजाच्या ईसाव्याची जोपासना केली जाते. एका मानसतज्ज्ञाने म्हटले आहे ते खरेच आसावे- रुढी, परंपरा अखंड असतात. त्या समाजाला भविष्याकडे पाहण्यासाठी काहीतरी देतात आणि एकंदरीत आनंददायी आणि नम्र बनवतात. कुटुंब असो अथवा समुदाय, जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करायला शिकवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com