
Karmaveer Bhaurao Patil Life Story: 22 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानावर आधारित त्यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना केली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन एका महान कार्याला वाहिलेले होते, पण त्यांचा हा प्रवास कधीही सोपा नव्हता. त्यांच्या आयुष्यात एक अशी धक्कादायक आणि निराशाजनक घटना घडली होती, ज्यामुळे ते इतके व्यथित झाले होते की, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे एकच उद्दिष्ट ठरवले की, समाजात शिक्षणाचे (Education) बीज पेरुन गरीब आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी ज्ञानाचा प्रकाश आणायचा.
आज आपण भाऊराव पाटील यांच्या जीवनातील अशा एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी त्यांच्या प्रचंड जिद्दीचे आणि सामाजिक कार्यामागील खरी प्रेरणा असल्याचे दर्शवते. ही घटना त्यांच्या विद्यार्थीदशेत, 1906 मध्ये घडली होती. त्यावेळी ते कोल्हापुरात शिक्षण घेत होते आणि त्यांचा स्वभाव अतिशय स्पष्टवक्ता, बेधडक आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा होता.
त्याच काळात, देशावर ब्रिटिश राजवट असल्यामुळे समाजात असंतोष वाढत होता. याच वातावरणात, कोल्हापुरातील एका महत्त्वाच्या ठिकाणी ब्रिटनचा सातवा एडवर्ड बादशहा याच्या पुतळ्याला डांबर फासल्याची घटना घडली. ही एक प्रकारची ब्रिटिश सत्तेविरोधातील निषेध कृती होती. पण, या घटनेचा खोटा आरोप कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे हा आरोप अत्यंत गंभीर मानला गेला. निर्दोष असूनही त्यांच्यावर हा खोटा आरोप ठेवण्यात आल्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे भाऊराव पाटील यांना प्रचंड मानसिक वेदना झाल्या. त्यांनी आयुष्यभर सत्याचा आणि न्यायाचाच पुरस्कार केला होता, पण जेव्हा स्वतःच अन्यायाचे बळी ठरले, तेव्हा त्यांचा स्वतःवरील आणि समाजावरील विश्वास डळमगू लागला. त्यांना वाटले की, जर त्यांच्यासारख्या शिक्षित आणि सधन कुटुंबातील व्यक्तीला न्याय मिळत नसेल, तर गरीब आणि अशिक्षित लोकांचे काय होत असेल? याच विचारांनी त्यांना खोलवर निराश केले. निर्दोष असूनही दोषी ठरवण्याच्या प्रवृत्तीला आणि समाजात पसरलेल्या अन्यायाला कंटाळून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्यांचा जीव वाचला
या घटनेनंतर ते पूर्णपणे बदलले. त्यांना कोल्हापूर (Kolhapur) सोडावे लागले. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा आणि निर्णायक क्षण ठरला. या कटू अनुभवाने त्यांना आतून तोडले नाही, तर अधिक मजबूत केले. त्यांनी ठरवले की, हा अन्याय आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी ते आपले जीवन समर्पित करतील. म्हणूनच, या अनुभवानंतर ते खऱ्या अर्थाने दारिद्र्य, अन्याय आणि शिक्षण न मिळालेल्या लोकांच्या समस्यांशी अधिक जोडले गेले. त्यांना हे लक्षात आले की शिक्षणाशिवाय माणसाला त्याच्या हक्कांविषयी आणि न्यायाविषयी जाणीव होणार नाही.
याच प्रेरणेतून, 1919 मध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाजातील सर्व स्तरातील मुलांना शिक्षण मिळावे, हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या संस्थेची रचना कोणत्याही धर्म, जात किंवा पंथावर आधारित नव्हती. ‘शिक्षण हे सर्वांसाठी’ हे त्यांचे सूत्र होते.
या संस्थेचा पाया ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानावर आधारित होता. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची फी भरता यावी यासाठी त्यांनी ही योजना सुरु केली. या योजनेनुसार, विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजच्या परिसरात काम करून, शेतीत मदत करुन किंवा इतर छोटे-मोठे काम करुन आपली फी आणि खर्चाची व्यवस्था करु शकत होते. या योजनेमुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.
शिक्षण हे केवळ उच्चवर्गीयांसाठी नाही, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. रयत शिक्षण संस्थेसाठी निधी जमा करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार केला नाही. संस्थेसाठी निधी कमी पडत असताना त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या अंगावरील दागिने विकले. लक्ष्मीबाईंनीही त्यांच्या या कार्याला पूर्ण पाठिंबा दिला.
कर्मवीरांनी एका गावोगावी जावून निधी गोळा केला. ते प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला भेटून त्याला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत. त्यांचे हे अथक प्रयत्न आणि त्याग पाहून अनेक लोक त्यांच्या कार्याला जोडले गेले. त्यांच्या कार्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे जीवन बदलले आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘कर्मवीर’ ठरले.
त्यांच्यावर झालेला अन्याय हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, तर तो समाजातील अन्यायाचे आणि अज्ञानाचे प्रतिबिंब होते. एका खोट्या आरोपाने त्यांचे आयुष्य बदलले आणि त्यातूनच एका महान शैक्षणिक क्रांतीचा उदय झाला. त्यांचा वैयक्तिक संघर्ष हा समाजाच्या उज्वल भविष्यासाठी केलेला त्याग होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.