

Ajit Pawar Death: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी घटना समोर आली. बारामती येथे झालेल्या एका खाजगी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आपल्या खासगी विमानाने मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंगच्या वेळी हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या अन्य पाच जणांचाही मृत्यू झाला असून यामध्ये त्यांच्या एका पीएसओ (PSO), दोन अटेंडंट आणि दोन वैमानिकांचा (क्रू मेंबर्स) समावेश आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी (28 जानेवारी) सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान घडला.
अपघाताच्या ठिकाणचे दृश्य अत्यंत विदारक असून विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगसाठी खाली येत असतानाच ते अनियंत्रित झाले आणि जोरदार धमाक्यासह कोसळले. विमान जमिनीवर आदळताच त्याला भीषण आग लागली आणि त्यामध्ये 4 ते 5 लहान मोठे स्फोट झाले.
आगीचे लोट इतके भीषण होते की, आसपासच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली असली तरी आगीमुळे विमानातील कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असून अपघाताची सविस्तर माहिती घेतली आहे.
अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर ही राज्याची मोठी हानी मानली जात आहे. मंगळवारीच त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पायाभूत सुविधा समितीच्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे नेते होते. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास संसदेपासून विधानसभेपर्यंत अत्यंत प्रभावशाली राहिला. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून लोकसभेवर निवडून आले होते, परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी ती जागा सोडली आणि त्यानंतर सलग सात वेळा विधानसभेवर बारामतीचे प्रतिनिधित्व केले.
गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या अजित पवार यांचे अशा प्रकारे अचानक जाणे, हे केवळ त्यांच्या पक्षासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का आहे. प्रशासनावर असलेली पकड आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 2019 मध्ये त्यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि तेव्हापासून ते राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. बारामती ही त्यांची कर्मभूमी होती आणि तिथेच त्यांच्या आयुष्याचा असा करुण अंत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.