

भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आपल्या बॅटने आग ओकली आहे. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात ईशानने केवळ २० चेंडूंत झंझावाती अर्धशतक झळकावत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीसह त्याने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज यष्टीरक्षक एमएस धोनीला मागे टाकत एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आतापर्यंत एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने यष्टीरक्षक म्हणून एका डावात ४५ धावा केल्या होत्या. ईशान किशनने नामीबियाविरुद्ध ६१ धावांची खेळी करत हा विक्रम मोडीत काढला. टी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक ठोकणारा तो भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. या यादीत ऋषभ पंत ४२ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ईशान किशनने आपल्या अर्धशतकासाठी केवळ २० चेंडू घेतले, जे टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून संयुक्तपणे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. त्याने युवराज सिंग (२००७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत अजूनही युवराज सिंग (१२ चेंडू) पहिल्या स्थानावर असून, केएल राहुल (१८ चेंडू) आणि रोहित शर्मा (१९ चेंडू) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
नामीबियाविरुद्धच्या सामन्यात ईशानने पॉवरप्ले संपण्यापूर्वीच आपले अर्धशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितने २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या, तर राहुलने २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध १९ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या. आता ईशानने २० चेंडूत ५० धावा कुटून या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.