Delhi Test Stats, India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (IND vs AUS 2nd Test) दिल्ली येथे होणार आहे. सध्या टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे.
दरम्यान, नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. आता ही आघाडी अभेद्य ठेवण्याकडे कर्णधार रोहित शर्माचे लक्ष्य असेल. मात्र, दिल्लीच्या या मैदानावर टीम इंडियाची बादशाहत कायम आहे. टीम इंडियाला या मैदानावर हरवणे खूप कठीण आहे. आकडे स्वतःच बोलत आहेत.
1987 मध्ये या मैदानावर भारतीय संघ शेवटच्या कसोटी सामन्यात पराभूत झाला होता. तेव्हा त्याला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र त्यानंतर दिल्लीत टीम इंडियाला कोणताही संघ मात देऊ शकलेला नाही.
25 नोव्हेंबर 1987 पासून सुरु झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 75 धावांवर आटोपला. अनुभवी दिलीप वेंगसरकर टीम इंडियाची कमान सांभाळत होते.
त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 127 धावांत गुंडाळला. कर्णधार वेंगसरकरांच्या (102) शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 327 धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या नाबाद शतकाच्या जोरावर विंडीज संघाने 85.3 षटकांत 276 धावांचे लक्ष्य गाठले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 मध्ये या मैदानावर खेळला गेला होता. यामध्ये भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर, 2015 मध्ये याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला गेला, ज्यामध्ये यजमानांनी 337 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
या मैदानावरील शेवटचा कसोटी सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात 2017 मध्ये खेळला गेला होता. विराट कोहलीने त्यावेळी द्विशतक झळकावले होते, परंतु श्रीलंकेचा संघ सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला होता.
2 डिसेंबर 2017 पासून, भारत (India) आणि श्रीलंका यांच्यात त्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु झाला. विराट यजमान संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. त्याने या सामन्यात 25 चौकारांच्या मदतीने 287 चेंडूत 243 धावा केल्या. मुरली विजयनेही 155 धावांची शानदार खेळी केली होती.
दुसरीकडे, भारताने पहिला डाव 7 गड्यांच्या मोबदल्यात 536 धावा करुन घोषित केला त्यानंतर श्रीलंकेने 373 धावा केल्या. विराटने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावत संघाने 5 विकेट्सवर 246 धावा करुन डाव घोषित केला. त्यामुळे श्रीलंकेला 410 धावांचे लक्ष्य मिळाले. संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 299 धावा केल्या, त्यानंतर पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला.
शिवाय, या मैदानावर आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी यजमान संघाने 13 जिंकले आहेत, तर 6 सामने गमावले आहेत. या मैदानावर 15 ड्रॉ झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.