

पणजी: गोमंतकीय जनता सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहे. जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवन करण्यात सरकार अपयशी ठरल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
पणजीत क्रांतिदिन कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना पत्रकारांशी बोलताना आलेमाव यांनी, नळपाणी पुरवठामंत्री सुभाष फळदेसाई यांनी पावसाचा तुटवडा राहिल्यास पाणीपुरवठ्यावर मर्यादा येऊ शकतात, या विधानावर प्रतिक्रिया दिली.
आलेमाव म्हणाले की, जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन याबाबत दीर्घकालीन नियोजनाची गरज असून सरकारकडून त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. माजी मंत्री रवी नाईक यांनी जलस्रोत पुनरुज्जीवन आणि अगदी दुबईला पाणी विकण्यासारखी दूरदृष्टी मांडली होती, मात्र त्यावेळी त्या कल्पनांची खिल्ली उडवली गेली होती, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र सरकारने पाणी बचतीसाठी बांधकामांवर मर्यादा घातल्याचे उदाहरण देत त्यांनी गोव्यातही अशा प्रकारच्या उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले. आगामी काळातील पावसाबाबत अनिश्चितता असल्याने पाणी व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी म्हादई नदीचे पाणी वळवण्याच्या प्रक्रियेवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली. तसेच ‘हर घर जल’ योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर टीका करत सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी युतीतील एकता कायम असल्याचे स्पष्ट केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर टीका करताना त्यांनी पोलिस यंत्रणेवरही गंभीर आरोप केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.