
विजय सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशन चालू असताना गोव्यातील काही कॅसिनोंवर स्टिंग ऑपरेेशन केले होते आणि त्यानंतर पोलिसांकडून त्या कॅसिनाेवर कारवाईही झाली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी, आपण राजकारणी झालो नसतो तर कदाचित पत्रकार झालाे असताे, असे म्हटले होते. विजयच्या या स्टिंग ऑपरेशननंतर काल सरकार ॲक्शन मोडवर आले आणि जुगाराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील दंड वाढविण्याचा निर्णय घेतला. विजय म्हणतात, त्यांच्याकडे आणखी काही कॅसिनोंचे स्टिंग ऑपरेशन शिल्लक आहे. हे सर्व पाहिल्यास पत्रकारांचे गुण त्यांच्यामध्ये ठायी ठायी भरले आहेत, हे दिसून येते. विजयने म्हटल्याप्रमाणे, राजकारणी न बनता ते जर पत्रकार झाले असते, तर अनेकांचे धाबे दणाणले असते, हे नक्की! ∙∙∙
राजधानी पणजीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शहरात अनेक कामे करण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत पणजीत जे ३५ प्रकल्प हाती घेण्यात आले होते, त्यातील ३१ प्रकल्पांवर सुमारे ६३०.३४ कोटींचा खर्च आल्याचे नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून सांगितले आहे. हे वाचून पणजीतच असलेल्या भाटले तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. प्रचंड रहदारी असलेल्या आपल्या भागांतील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे पाहून ६३०.३४ मधील किती कोटी तुमच्यावर खर्च झाले, असा प्रश्न नागरिक मनातूनच त्यांना विचारत असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी आसाममध्ये होते. तेथील पोलिस प्रशिक्षण अकादमीतील दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे आगमन झाल्यावर त्यांंना आसामी टोपी भेट देण्यात आली. काहीवेळ त्यांनी ती डोक्यावर परिधान केली. लष्करातील आसाम रायफल्स परिधान करते, तशी ती टोपी नंतर डोक्यावरून काढू असा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात आला आणि झटक्यात ती टोपी त्यांनी काढली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी समारंभावेळी ती टोपी परीधान करणे आवश्यक आहे, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून दिली. त्यामुळे समारंभभर मुख्यमंत्री आसामी टोपीत दिसले. ∙∙∙
भटक्या कुत्र्यांच्या त्रास संपूर्ण राज्याला होत आहे, त्यामुळे गोवा सरकारने आता या कुत्र्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांवर अत्याचार झाल्यास बिगर सरकारी संस्था आवाज उठवतात. सध्या राज्यात या कुत्र्यांचा उपद्रव नियंत्रणाबाहेर गेला आहे. कुत्र्यांच्या चाव्याचे प्रमाण वाढले असल्याने सरकारला त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे होते. या भटक्या कुत्र्यांचा विषय अगदी विधानसभेपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे यावर नियंत्रण आणावे, ही मागणी जोर धरू लागली. अखेर सरकारने त्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी या दलावर आहे. पाळीव किंवा जंगली प्राण्यांचे, पाळीव कुत्र्यांचे पुनर्वसन होऊ शकते, पण भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन करणे म्हणजे कृती दलाची अग्नीपरीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे आता सरकारने दल स्थापन करून पहिला अडथळा दूर केला आहे, पण त्यानंतरचे अडथळे हे दल कसे पार करतेय, हे पहावे लागणार आहे. ∙∙∙
गेल्या काही दिवसांपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एस.एस.बी. विभागातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘चांगली वागणूक मिळत नाही,’ अशी तक्रार अनेक रुग्ण रोज करत आहेत. यामुळे गोमेकॉतील कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉच्या कामकाजात हस्तक्षेप केला होता. त्यानंतर आता अशी चर्चा सुरू आहे की, मंत्र्यांनी आपला ‘हात आखडता घेतला असावा’, म्हणूनच कर्मचारी अशी वागणूक देत आहेत. याबद्दल रुग्णांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. रुग्णांच्या म्हणण्यानुसार, आरोग्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून, रुग्णांना चांगली वागणूक मिळेल याची खातरजमा करावी. आरोग्यमंत्री लक्ष घालतील का? ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक मंगळवारी दिल्लीत होते. राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी एक दिवसाचा अभ्यास वर्ग आयोजित करावयाच्या पूर्वतयारीसाठी ते दिल्लीत गेले असले तरी अनेकांनी त्यावरून कल्पनेचे पतंग उडवायला सुरवात केली आहे. काहींनी दामू दिल्लीतून पतल्यावर मंत्रिमंडळ फेररचना होणार, असा शोधही लावून तो जाहीर केला आहे. दामू हे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांना भेटले. याआधीही मंत्र्यांची प्रगतीपुस्तके संतोष यांना सुपूर्द केल्याचे दामू यांनी जाहीरपणे सांगितले होते. तरीही मंत्रिमंडळातील फेरबदलाला मुहूर्त सापडला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या भेटीने फारसे काही होईल, असे मंत्रिपदासाठी इच्छूकांनाही वाटत नाही, यातच सारे आले. ∙∙∙
पावसाळी अधिवेशन काळात विविध विषयांवरून आपल्याच सरकारच्या मंत्र्यांवर घसरलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो आता विधानसभेबाहेरही मंत्र्यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. राज्यातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना, अनेक मंत्री कामच करीत नाहीत. आपल्या खात्यांना न्याय देत नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळात फेरबदलात मायकल किंवा त्यांच्या पत्नी तथा शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता काही महिन्यांपूर्वी वर्तवण्यात येत होती. परंतु, ही चर्चा मागे पडल्यामुळे आणि मंत्रिपदावर दावा करण्यासाठीच मायकल, अशी वक्तव्ये करीत आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.