
फोंडा: गोव्याच्या राजकाणातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खासदार, आमदार ते विविध खात्याची मंत्रिपदं भूषविलेल्या रवी नाईक यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी वयाच्या ७९ वर्षी रवींचे निधन झाले. राज्यातील राजकारण, सरकार आणि प्रशासनावर रवींनी आपल्या कतृत्वाने वेगळा ठसा उमटवला आहे.
मंत्री रवी नाईक यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने आज (१५ ऑक्टोबर) एक दिवसीय सुट्टी जाहीर केली आहे. तर, १५ ते १७ ऑक्टोबर असे तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे. रवींवर बुधवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास फोंड्यात अंत्यविधी केला जाणार आहे. भंडारी समाजाचे नेते म्हणून रवींची वेगळी ओळख होती. कुळ आणि मुंडकार यांच्या हक्कासाठी त्यांनी सुरु केलेली चळवळ गोंमतकीयांच्या नेहमीच स्मरणात राहील.
गृहमंत्री म्हणून देखील रवी नाईक यांची कारकीर्द गोमंतकीयांच्या लक्षात राहील. रवींनी राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांना फ्री हँड दिला होता. कारवाईसाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. गुंडगिरीच्या बंदोबस्तासाठी त्यांनी विशेष पोलिस पथकांची स्थापना केली होती. रुडाल्फ आणि व्हिक्टोरिया फर्नांडिस ते अगदी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांची अटक या घटना गोव्यात ऐतिहासिक ठरल्या.
गोव्यात आदिवासीबहुल तिसरा जिल्हा स्थापन करण्यात यावा, अशी कल्पना सर्वात पहिल्यांदा रवी नाईक यांनी मांडली. रवींच्या या मागणीचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये निर्णय झाला व अखेर तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देखील दिली. अर्थमंत्री सावंत यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देखील तिसऱ्या जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला होता. यावर्षी (२०२५) जिल्हा निर्मितीबाबतचे सर्व सोपस्कर पूर्ण केले जाईल, असेही सावंतांनी स्पष्ट केले होते.
फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या तालुक्यांचा मिळून तिसरा जिल्हा स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान, यातून फोंडा तालुका वगळण्याचे राजकारण सुरु असल्याची चर्चा वारंवार समोर आली आहे. तिसऱ्या जिल्ह्याचा आग्रह धरणाऱ्या रवी नाईक यांचा तालुका यातून खरचं वगळला जाणार का? की त्याचा समावेश करुन रवींना सरकार मानवंदना देणार? हे जिल्हा स्थापनेची प्रक्रिया जशी – जशी पुढे तसे स्पष्ट होईल.
तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेबाबत निर्णय झाल्यापासून सरकारी पातळीवर नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय कोठे व्हावे यावरुन राजकारण सुरु असले तरी नव्या जिल्ह्यामुळे दक्षिणेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, तिसऱ्या जिल्ह्याचे मूर्त स्वरुप पाहण्यास रवी उपस्थित नसतील ही शोकांतिका कायम राहणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.