

पणजी: मनोज परब यांनी अध्यक्षपदासह संस्थापक सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वीच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) केंद्रीय कार्यकारिणीने (सीईसी) विधानसभेच्या सर्वच मतदारसंघांतील गटसमित्या बरखास्त केल्या होत्या, असे आज उघड झाले. यातून परब उघडे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
याविषयी आतापर्यंत शांत असलेले आमदार वीरेश बोरकर येत्या सोमवारी मौनव्रत सोडणार, अशी माहिती ‘आरजीपी’तील सूत्रांनी दिली. ‘आरजीपी’मध्ये गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू होता. त्यातच आमदार बोरकर यांना जवळचे असलेले आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा यांच्यावर ‘आरजीपी’ने कारवाई केली. या कारवाईमुळे पक्षाचा सांत आंद्रे गट तत्कालीन अध्यक्ष परब यांच्या विरोधात आक्रमक झाला. त्यातून पक्षात परब आणि बोरकर, असे दोन गट पडले होते.
त्यानंतर काही दिवसांनी परब यांनी ‘फेसबूक’वरून आमदार बोरकर आणि त्यांच्या समर्थक सदस्यांवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली. बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत गेल्या सोमवारी स्पष्टीकरण देण्यासाठी ‘सीईसी’च्या बैठकीलाही बोलावले होते. परंतु, आपण गोव्याबाहेर असल्याचे सांगत बोरकर यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर गेल्या बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना, ‘वादामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ‘सीईसी’समोर येणार’, असे आव्हान बोरकर यांनी परब यांना दिले होते.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाध्यक्ष पदासह संस्थापक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. शिवाय राजकारणातून संन्यास घेत असल्याचीही घोषणा केली होती. विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर हे मनोज परब यांच्या जवळचे मानले जात होते. शिवाय राजीनामा नाट्यानंतरही आम्ही परब यांचे विचार घेऊन पुढे जाऊ, असेही त्यांनी म्हटले होते. पण, राजीनाम्याच्या आधीच ‘सीईसी’ने गटसमित्याच बरखास्त केल्याने राजकीयदृष्ट्याही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परब यांच्या राजीनाम्यानंतर ‘सीईसी’ तत्काळ कोणताही निर्णय घेणार नाही असे वाटत असतानाच, सर्वच विधानसभा मतदारसंघांतील पक्षाच्या गटसमित्या १९ रोजीच बरखास्त केल्याचे समोर आले आहे. बरखास्तीचे पत्रक सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी जारी केले आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत फेररचना करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला असून, नव्या समित्यांची स्थापना लवकरच करण्यात येईल’, असेही नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे. यातून मनोज परब मात्र पूर्णत: उघडे पडल्याचे दिसून आले.
परब यांच्या राजीनाम्यानंतर आजपर्यंत आमदार वीरेश बोरकर यांनी मौन धारण केले होते. परंतु, आपल्या विश्वासातील राज्यभरातील कार्यकर्त्यांशी त्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचना आणि सल्ले ते घेत असून, सोमवारपासून ते मैदानात उतरून आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती ‘आरजीपी’च्या सूत्रांनी दिली. वीरेश पक्ष ताब्यात घेणार, की अन्य कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.