

पणजी: झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे, असा सवाल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी उपस्थित केला. देशातील प्रत्येक राजकीय आणि सामाजिक विषयावर भूमिका मांडणारे काँग्रेसचे नेते झारखंडच्या प्रश्नावर मात्र गप्प का आहेत, असा सवाल करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजपच्या पणजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गुदिन्हो बोलत होते. यावेळी भाजपचे प्रवक्ते सिद्धेश नाईक आणि प्रदेश सचिव दयानंद सोपटे उपस्थित होते. झारखंडमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कोणतीही ठोस भूमिका मांडली जात नसल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजप प्रवक्ते सिद्धेश नाईक यांनीही या मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आणि राहुल गांधी देशभरात लोकशाही धोक्यात असल्याचे आरोप करतात; मग झारखंडच्या बाबतीत तेच निकष का लागू केले जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसची भूमिका विषयानुसार बदलते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
प्रदेश सचिव दयानंद सोपटे यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना, राजकारणात सोयीचे मुद्दे निवडून आवाज उठविण्याची काँग्रेसची पद्धत असल्याचा आरोप केला. लोकशाही, संविधान आणि जनतेच्या अधिकारांबाबत काँग्रेसकडून मोठमोठी विधाने केली जातात. मात्र, प्रत्यक्षात राजकीय सोय पाहून भूमिका घेतली जाते, असे सोपटे म्हणाले.
विषयावर बोलण्यास नेमकी अडचण काय?
गुदिन्हो यांनी काँग्रेसच्या कथित मौनावर थेट बोट ठेवत, झारखंडच्या मुद्यावर काँग्रेसला बोलण्यास नेमकी अडचण काय आहे, असा सवाल केला. विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने या प्रकरणात मौन का बाळगले आहे, याचे स्पष्टीकरण काँग्रेसने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.