

पणजी : आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांची आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पाठविलेल्या प्रस्तावाचे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने स्वागत केले आहे.
राज्य आणि येथील जनतेचा सकारात्मक विचार करून अर्थपूर्ण चर्चेसाठी ‘आरजी’ तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार वीरेश बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आमदार बोरकर यांनी पुढे म्हटले आहे की, आज गोवा एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा आहे, हा प्रश्न केवळ निवडणुकीचा किंवा राजकीय समीकरणांचा नाही, तर भावी पिढ्यांसाठी आपण कोणता गोवा सोडून जाणार आहोत, हा आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाकडून आघाडीच्या चर्चेला स्थगिती दिल्यानंतर आता काँग्रेसने ‘आरजी’कडे आघाडीच्या चर्चेची दारे खुली केली आहेत. अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्य राज्यातील जमीन, अस्मिता, संस्कृती, पर्यावरण, जंगल आणि समृद्ध वारसा जोपासला आहे. या सर्व घटकांचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्याच्या सरकारच्या निर्णयाने या सर्व घटकांना धक्का बसला आहे, त्यामुळे याविरोधात गोमंतकीयांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे, प्रसंगी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचा सूर उमटू लागला आहे.
गोव्याच्या रक्षणावर मनापासून विश्वास असणाऱ्या राजकीय शक्ती एकत्र आल्या, लोकांच्या आकांक्षा समजून घेतल्या आणि राजकीय हितापेक्षा गोव्याच्या हिताला प्राधान्य दिले, तर विश्वासार्ह आणि एकजूट पर्यायाच्या शोधात असलेल्या लाखो गोमंतकीयांना यामुळे नक्कीच आशा मिळेल. त्यामुळे, ‘आरजी’ हा प्रदेश काँग्रेसकडून सकारात्मक व विधायक प्रतिसाद आणि अर्थपूर्ण चर्चेची अपेक्षा करीत आहे. प्रामाणिक भावनेने चर्चा करण्यास आम्ही तयार असल्याचे बोरकर यांनी नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.