

पणजी: रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षासोबत (आरजीपी) जिल्हा पंचायत निवडणुकीत युती करण्याचे प्रयत्न आपण अखेरपर्यंत केले. परंतु, शेवटच्या टप्प्यात मनोज परब यांनी नकार दिल्यामुळेच काँग्रेसची आरजीपीशी युती झाली नाही. त्यामुळे आम्ही गोवा फॉरवर्डला सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते. जिल्हा पंचायत आणि २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी संघटित व्हावे, अशी गोमंतकीय जनतेची इच्छा होती.
त्यानुसारच आम्ही काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी तीन पक्षांच्या युतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. सांताक्रूजच्या जागेवरून आरजीपीमध्ये निराशा होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि मनोज परब यांच्याशी बैठकही घेतली होती.
त्यानंतर मात्र आरजीने विविध मतदारसंघांत आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवार जाहीर केलेले असल्यामुळे आपण युतीत येणार नसल्याचे त्यांनीच शेवटच्या क्षणी सांगितले, असे ठाकरे म्हणाले.
१५२ कोटींचा निधी अडकला!
पंधराव्या वित्त आयोगाने २०२५–२६ साठी पंचायती व जिल्हा पंचायतींसाठी ३६८ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, अनेक पंचायतींनी खर्चाचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यातील १५२ कोटींचा निधी केंद्र सरकारने राज्याला दिलेले नाहीत. त्यामुळे पंचायतींचा विकास रखडल्याची टीकाही अमित पाटकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.