
पणजी : गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तीव्रता घटली असून, उष्णतेची चटक जाणवू लागली आहे. आज, मंगळवारी सकाळपासूनच कडकडीत ऊन पडले होते. दुपारच्या वेळी तर उन्हाळ्यासारखा उष्मा जाणवत असल्याची नोंद नागरिकांनी केली.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. त्याचबरोबर कमाल आर्द्रता तब्बल ९५ टक्क्यांवर पोहोचली. त्यामुळे उष्णतेसोबतच दमट हवामानाचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला.
मागील २४ तासांत राज्यात केवळ ५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे आत्तापर्यंत एकूण पावसाचे प्रमाण २९४७ मिलिमीटर, म्हणजेच सुमारे ११६ इंचांपर्यंत पोहोचले आहे. ही नोंद सरासरी पावसाच्या तुलनेत ४.९ टक्के अधिक आहे.
मान्सून हंगामात आतापर्यंत राज्यात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी सध्या आकाशात पांढऱ्या-निळसर ढगांचे प्रमाण वाढले असून, पावसाच्या सरी विरळ्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी दुपारनंतर उमसते वातावरण जाणवत आहे.
गोवा वेधशाळेच्या अहवालानुसार, पुढील आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाची चिन्हे नाहीत. फक्त तुरळक प्रमाणात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार वर्गाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीसंबंधी नियोजन करावे, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने पर्यटन क्षेत्रात मात्र काहीशी दिलासा व्यक्त होत आहे. सलग पावसामुळे मागील काही आठवड्यांत पर्यटनावर परिणाम झाला होता. उष्णतेसह उघडीप पडल्यामुळे काही प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात सप्टेंबरअखेर पुन्हा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.