Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

Goa Liberation Day 2025: आज १९ डिसेंबर. संपूर्ण भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला, तरी गोव्याला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी तब्बल १४ वर्षे वाट पाहावी लागली होती.
Goa Liberation Day
Goa Liberation DayDainik Gomantak
Published on
Updated on

आज १९ डिसेंबर. संपूर्ण भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला, तरी गोव्याला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी तब्बल १४ वर्षे वाट पाहावी लागली होती. ४५० वर्षांची प्रदीर्घ पोर्तुगीज राजवट मोडीत काढून आजच्याच दिवशी १९६१ मध्ये भारतीय सैन्याने गोव्याला मुक्त केले. हा दिवस केवळ गोव्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एका ऐतिहासिक विजयाचे प्रतीक आहे.

स्वातंत्र्यासाठीची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि 'ऑपरेशन विजय'

भारत स्वतंत्र झाला तेव्हा पोर्तुगीजांनी गोवा, दमण आणि दीव सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. अनेक वर्षे शांततेच्या मार्गाने आणि राजनैतिक पातळीवर चर्चा करूनही जेव्हा पोर्तुगीज बधले नाहीत, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. १८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने एकत्रितपणे 'ऑपरेशन विजय' सुरू केले. केवळ ३६ तासांच्या या धडाकेबाज मोहिमेनंतर पोर्तुगीज सैन्य शरणागती पत्करण्यास भाग पडले आणि १९ डिसेंबर रोजी गोव्याच्या मातीवर तिरंगा डौलाने फडकला.

Goa Liberation Day
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

मोहन रानडे: एक धगधगते अग्निकुंड

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील सांगलीचे सुपुत्र मोहन रानडे यांचे योगदान अतुलनीय आहे. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या रानडे यांनी शिक्षकाचे रूप धारण करून गोव्यात प्रवेश केला आणि 'आझाद गोमंतक दल'ची स्थापना केली. १९५५ मध्ये बेती पोलीस चौकीवरील हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथील तुरुंगात तब्बल १४ वर्षे डांबून ठेवण्यात आले होते. १९६१ मध्ये गोवा मुक्त झाला तरी रानडे यांची सुटका १९६९ मध्ये झाली. त्यांच्या या बलिदानासाठी त्यांना 'पद्मश्री' आणि 'गोवा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.

रणरागिणींचे पडद्यामागचे योगदान

गोव्याच्या लढ्यात केवळ पुरुषांनीच नव्हे, तर स्त्रियांनीही मोलाची भूमिका बजावली. १९४६ पर्यंत महिलांचे योगदान अप्रत्यक्ष होते; त्या घरातील पुरुषांना लढण्यासाठी प्रोत्साहित करत असत. मात्र, त्यानंतर अनेक महिलांनी भूमिगत राहून निरोप पोहोचवणे, क्रांतिकारकांना आश्रय देणे आणि पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जनमत तयार करणे अशी जोखमीची कामे केली. इतिहासाच्या पानांवर या रणरागिणींची नावे तितकीशी आली नसली, तरी त्यांच्या सहभागाशिवाय हा लढा पूर्ण होऊ शकला नसता.

Goa Liberation Day
Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

संघर्षाचा ऐतिहासिक वारसा

गोव्याचा स्वातंत्र्यलढा केवळ १९६१ चा नव्हता. याची मुळे १५५५ मधील करविरोधी आंदोलनात आणि १७८७ च्या 'पिंतो बंडा'त दडलेली होती. १८३५ मध्ये बर्नाडो पेरेस दा सिल्वा या पहिल्या गोवन व्यक्तीने उच्च पद भूषवले, पण त्यांनाही युरोपियन लोकांनी पदावरून हटवले. राम मनोहर लोहिया यांनी १९४६ मध्ये या आंदोलनाला नवी धार दिली, ज्यामुळे गोमंतकीय जनतेमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि शेवटी पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जोखडातून गोव्याची कायमची सुटका झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com