

पणजी: खासगी क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या किमान वेतनात त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार वाढ करण्यात येईल. शिवाय त्यांना कदंबसह ‘माझी बस’ योजनेअंतर्गत चालणाऱ्या बसेसच्या तिकिटांमध्येही सूट दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
कामगार खात्यातर्फे ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आयोजिलेल्या रोजगार मेळ्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात आणि आयुक्त राजेश आजगावकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की खासगी कंपन्यांना सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाते.
त्यामुळे अशा कंपन्यांनी गोमंतकीय कामगारांना पूर्णपणे सहकार्य करणे, अनुभवानुसार त्यांच्या वेतनात वाढ करणे गरजेचे आहे. अशा कंपन्यांशी चर्चा करून तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात त्यांच्या अनुभवानुसार वाढ करण्याचा विचार सरकारने केला अाहे.
खासगी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना
‘‘खासगी क्षेत्रात २० किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केलेल्या कामगारांना १५ हजार रुपयांचा एकरकमी बोनस सरकारकडून देण्यात येत आहे. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीही देण्यात येत आहेत. पुढील काळात अशा कामगारांसाठी गृहनिर्माण योजनाही सुरू करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीच्या मागे न लागता गोमंतकीय युवकांनी खासगी क्षेत्रातील नोकऱ्या स्वीकारून आर्थिक विकास साधावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोन हजारांहून अधिक युवकांना सुसंधी
युवकांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी कामगार खात्याने आतापर्यंत १२ रोजगार मेळे घेतले. त्यातून दोन हजारांहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. ताळगाव येथील रोजगार मेळ्यात सुमारे १५० कंपन्यांनी सहभाग घेतला असून, १० हजारांहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या मेळ्यातही अधिकाधिक युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
‘ती’ माहिती जमा करण्यास सुरुवात
‘‘औद्योगिक विकास महामंडळाच्या (आयडीसी) वसाहतींमध्ये स्थानिकांना मिळालेल्या रोजगारावर कामगार निरीक्षकांमार्फत वैयक्तिकरित्या देखरेख ठेवण्याची मोहीम सुरू केली आहे. उद्योगांमध्ये किती गोमंतकीय काम करतात आणि त्यापैकी कितीजणांची नोकरी कायम झाली आहे याची ‘आयडीसी’निहाय माहिती गोळा करण्याची जबाबदारी कामगार निरीक्षकांवर सोपविली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.
खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या गोमंतकीयांना नोकरी करीत पुढील शिक्षण घेण्याचीही व्यवस्था राज्य सरकार करीत आहे. त्यासाठी दोन ते तीन विद्यापीठांशी सामंजस्य करारही करण्यात येणार आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.