

पणजी: मुंडकार कायद्यांतर्गत मुंडकाराला त्याचे हक्क देईपर्यंत जमीनमालकाला जमीन विकता येणार नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेंतर्गत स्वयंपूर्ण मित्र, सरपंच, नगराध्यक्ष, पंच, नगरसेवक यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, बहुतेकवेळा मुंडकार कायद्याखाली मुंडकार अर्ज करत नाहीत. अशावेळी जमीनमालकाने जमीन विक्रीस काढल्यास मुंडकाराचे हक्क अबाधित राहत नाहीत. त्यामुळे आधी मुंडकाराला त्याचा हक्क या त्यानंतरच जमीन व्यवहार करता येणार तसा निर्णय सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जाईल. जमिनीला दर आल्याने जमीनमालक मुंडकाराच्या घरासह जमीन विकू लागले आहेत.
अचानकपणे एक दिवस मुंडकाराला आता जमीनमालक नवा झाल्याचे समजते. तसे होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत मुंडकारांना सरकारकडे तक्रारी करणे सुरु केले आहे. नवा जमीनमालक सतावतो. असे तक्रारीचे स्वरुप आहे. त्यामुळे मुंडकाराला हक्क देईपर्यंत जमीन व्यवहार होऊ द्यायचाच नाही, असे ठरवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच, माझे घर योजनेला 40 मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला, सर्व गोमंतकीयांना त्याचा फायदा व्हावा, असा यामागे हेतू आहे. आल्वारा, मोकासो, महसूल जमिनीत (Land) बांधलेली घरे नियमित करण्यात येत आहेत. त्यासाठी 28 फेब्रुवारी 2014 पूवी घर बांधलेले असावे आणि अर्जदार तत्पूर्वी 15 वर्षे गोव्यात वास्तव्यास असल्याचा दाखला हवा, माझे घर योजनेतर्गंत जमिनीची मालकी मिळेल, अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या कायद्यांतर्गत अर्ज करुन घर नियमित करुन घ्यावे लागणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अतिरिक्त महसूल सचिव सुरेंद्र नाईक, नियोजन व सांख्यिकी उपसंचालक कैलास गोखले उपस्थित होते.
गृहनिर्माण मंडळाने गरिबांना घरे बांधून दिली. मात्र, त्या घरांची कायदेशीर मालकी त्यांना दिली नव्हती. अशा घरांची मालकी त्यांना देण्याचा निर्णयही सरकार घेणार आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. गृहनिर्माण सोसायट्या किंवा विकासकांनी बांधून दिलेल्या इमारतीखालील जमिनीची मालकी त्यांना देण्यासाठी नियमांत सुधारणा केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, कुटुंबांतर्गंत मालमत्ता हस्तांतरणासाठी केवळ 5 हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. आजोबाच्या नावावर असलेली मालमत्ता वडील किंवा मुलाच्या नावे करण्यासाठी हजारो रुपयांचे शुल्क भरण्याची तयारी नसल्याने मालमत्ता आजोबांच्याच नावावर ठेवली जाते. ती आता हयात असलेल्यांच्या ना करण्यासाठी केवळ 5 हजार रुपये खर्च येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.