
पर्वरी: गोव्यात नव्याने तीन रेल्वे स्थानक उभारली जातील अशी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आली. घोषणा झाल्यापासून गोव्यात तिन्ही रेल्वे स्थानकांना विरोध होत आहे. सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आजपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेवरा येथील रेल्वे स्थानकावरुन प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले. यात विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्न विचारत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
मंत्री माविन Vs वीरेश बोरकर
'कोकण रेल्वेने दिलेल्या उत्तरानुसार नवीन तीन रेल्वे स्थानकं रेल्वेच्या व्यवस्थित संचलनासाठी केली असल्याची माहिती आहे. संचलनात होणाऱ्या विलंब विचारात घेऊन ही स्थानकं केली जातायेत. करमळी आणि वेर्णा स्थानकात १५.९६ किलोमीटर (सुमारे १६ किमी) अंतर आहे. नेवरा येथील स्थानकामुळे रेल्वे संचलनाचा वेळ कमी होणार आहे', अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
'कोकण रेल्वने १९९८ मध्ये भूसंपादनासाठी मोठा विरोध झाला होता, तरीही कोकण रेल्वे गोव्यात आलीच. नव्या रेल्वे स्थानकांबाबत त्याचवेळी नियोजन करण्यात आले होते. कोकण रेल्वे नव्याने काहीच करत नाहीये, तसेच यासाठी नव्याने भूसंपादन देखील केले जाणार नाही', असे गुदिन्हो यांनी बोरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दरम्यान, मंत्री माविन यांच्या उत्तरामुळे समाधानी न झालेल्या आमदार वीरेश बोरकर यांनी लोकांना नको असलेले रेल्वे स्थानक का उभारले जातेय? तसेच करमळी रेल्वे स्थानकावर किती रेल्वे थांबतात असा प्रतिप्रश्न केला. मंत्र्यांनी प्रश्नाला चुकीचे उत्तर दिले असेही बोरकर म्हणाले. माविन यांनी यावर स्पष्टीकरण देताना उत्तर चुकीचे नाही. नेवरा रेल्वे स्थानक फक्त क्रॉसिंग रेल्वे स्थानक म्हणून उभारलं जाणार आहे, असे माविन म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर मध्यस्थी करत माविन यांच्या उत्तराला दुजोरा दिला. तसेच, नेवरा रेल्वे स्थानक नको म्हणून पत्र देण्यापेक्षा करमळी रेल्वे स्थानकावर अधिक रेल्वे थांबाव्यात यासाठी पत्र द्यायला हवे होते, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी गेल्या अधिवेशनात रेल्वे स्थानकांना विरोध असणाऱ्यांनी पत्र द्यावे आपण याबाबत चर्चा करु असे सांगितले होते, पण या अधिवेशनात ते दुसरेच बोलतायेत, असे बोरकर म्हणाले. तसेच, नेवरासह शेजारील गावातील नागरिक या रेल्वे स्थानकासाठी विरोध करतायेत. मग रेल्वे स्थानकासाठी एवढा अट्टाहास कशासाठी? असे बोरकर म्हणाले.
आलेमावांनी उपस्थित केला सवाल
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील यावर बोलताना यातील नेवरा रेल्वे स्थानक परिसरात खाजन जमीन आहे यासाठी काय उपाय केले जाणार आहेत? उद्या क्रॉसिंग रेल्वे स्थानक जेव्हा प्रवासी रेल्वे स्थानक होईल यावर कसा तोडगा काढला जाईल, असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला.
यावर बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी नवे रेल्वे स्थानक तसेच रेल्वे डबल ट्रॅकिंग होत नाही तोवर गोमंतकीयांना लोकल रेल्वेचा लाभ मिळणार नाही, असे सावंत म्हणाले. यामुळे रस्ते मार्गावरील ताण कमी होईल शिवाय मोपा सारख्या विमानतळाला देखील कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, असे सावंत म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांना सर्व ठिकाणी फक्त कोळसाच दिसतोय, असा टोमणा देखील सावंत यांनी लगावला.
क्रूझ सिल्वा यांनी नव्याने येणारे रेल्वे स्थानक सां जुझे द आरियाल येथे येणार आहे का सारझोरा हे स्पष्ट करण्याची मागणी केली. माविन यांनी यावर बोलतान सारझोरा असे स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.