तृणमूलमुळेच काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले: ग्लेन टिकलो

हळदोणा येथे तृणमूलच्या किरण कांदोळकर यांनी भाजपची मते खाल्ल्याने काँग्रेसचे कार्लोस फेरेरा तिथे जिंकून आले
TMC
TMCDainik Gomantak

गोवा: गोव्यात तृणमूल पक्ष काँग्रेसची मते फोडण्यासाठी आला आहे, असा आरोप सर्वत्र होत आहे. मात्र तृणमूलमुळेच काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला, असे सांगितल्यास कोणाला खरे वाटेल का? हा आरोप आम्ही करत नाही, तर भाजपचे ग्लेन टिकलो यांनी केला आहे. हळदोणा येथे माझा पराभव होण्यास तृणमूल कॉंग्रेस पक्ष कारणीभूत ठरला, असे कारण त्यांनी दिले आहे. तृणमूलच्या किरण कांदोळकर यांनी भाजपची मते खाल्ल्याने काँग्रेसचे कार्लोस फेरेरा तिथे जिंकून आले, असा दावा टिकलो यांनी केला आहे. आहे की नाही गंमत?

TMC
पणजी बाजारात मासळी महागली

‘एक मराठोंकी’

भंडारी समाजाचा मुख्यमंत्री होण्यावरून निवडणुकीआधी बराच खळखळाट झाला. आम आदमी पक्षाने आपला मुख्यमंत्री पदासाठीचा भंडारी चेहरा जाहीर देखील केला. त्यामुळे इतर पक्षांनी-विशेषत: भाजपने भंडारी उमेदवारांचा टक्का घसरणार नाही, याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष दिले. सध्याच्या भाजपच्या आमदारांकडे पाहता भंडारी मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. पण क्षत्रिय मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांसह किमान दोन मंत्रिपदे मिळू शकतात.

समाजाच्या संघटनेने आपल्या ज्ञातीबांधव आमदारांचे अभिनंदन करणारी जाहिरातही वृत्तपत्रांतून दिली असून त्यात प्रमोद सावंत, विश्‍वजीत राणे, डॉ. चंद्रकांत शेट्ये, सुभाष फळदेसाई, उल्हास तुयेकर आणि कॉंग्रेसचे राजेश फळदेसाई यांची छायाचित्रे आहेत. ‘सौ सुनारकी, एक लुहारकी’ अशी हिंदीत म्हण आहे. तिचाच धागा पकडून या जाहिरातीला ‘एक मराठोंकी’ असे म्हणायचे का?

नेते वाऱ्यावर

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राजकीयदृष्ट्या गेम करण्यासाठी अनेक शक्ती वावरल्या. विशेषतः बाबाने तर आपल्या महत्त्वाकांक्षेआड येणाऱ्या सावंतांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी पैशांचा महापूर ओतला, हे खुद्द माविननेच जगजाहीर करून टाकले. मात्र, सावंतांचा देव मजबूत होता, त्यामुळेच ते बचावले, असे खुद्द त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

एक मात्र खरे, साखळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते निष्क्रिय ठरले. कारण मुख्यमंत्री म्हटल्यावर मतांची टक्केवारी मागच्या निवडणुकीपेक्षा वाढायला हवी होती. पण तसे न होता सावंतांना एकेका मतासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे परिश्रम ते कोणते? कार्यकर्त्यांनी फक्त कुटुंबीय, नातेवाईकांना नोकऱ्या देण्यात आणि लाभ उठवण्यात प्रतिष्ठा पणाला लावली. नेत्यांकडे मात्र, अक्षम्य दुर्लक्ष केले, असे भाजपचे निष्ठावंतच बोलत आहेत!

विश्वजीत-रेजिनाल्ड मिळाले

विश्वजीत राणे यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असे जरी सांगितले असले तरी त्यांना हे पद मागच्या कित्येक वर्षांपासून खुणावत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच ते काँग्रेस आमदारांच्या संपर्कातही असायचे.

हेच विश्वजीत शनिवारी चक्क अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याबरोबर जांबावली येथे श्री दामोदराचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर या निवडणुकीत रेजिनाल्ड यांना साहाय्य केलेले भाजपचे भावेश जांबावलीकर हेही होते. आता त्यांनी दामबाबाकडे काय मागितले, ते मात्र कळले नाही. मात्र, देवळातून बाहेर आले, तेव्हा विश्वजीत आणि रेजिनाल्ड या दोघांचाही चेहरा प्रसन्न दिसत होता.

युरीने लाज राखली

2012 मध्ये घराणेशाहीविरुध्दच्या लाटेत आलेमाव कुटुंबातील चारजण कुठल्या कुठे वाहून गेले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यातील चर्चिल पुन्हा निवडून आले आणि त्यावेळी ज्योकीम मात्र पडले. पण यावेळी त्यांचे पुत्र युरी यांनी कुंकळ्ळीतून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळविल्याने एकप्रकारे आलेमाव कुटुंबाची लाज राखल्यासारखे झाले आहे. यावेळी चर्चिल आणि त्यांची कन्या वालंका यांना मात्र मतदारांनी घरी बसविले असले तरी युरी विधानसभेत पोचले आहेत. २०१२ मध्ये चर्चिल आणि त्यांची लेक तसेच ज्योकीम आणि त्यांचा पुत्र युरी या सर्वांचा पराभव झाला होता. पण आता युरीच्या रूपात नवीन दमदार आलेमाव राजकारणात उतरला आहे. आलेमाव घराण्याचा हा नवीन अध्याय म्हणायचा का? ∙∙∙

विजयासाठी आटापिटा

‘ट्राय ट्राय टिल यु सक्सिड’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. कुंकळ्ळीचे नवनिर्वाचित आमदार युरी आलेमाव यांना ही म्हण अचूक लागू पडते. 2012सालच्या निवडणुकीत युरी सांगे मतदारसंघात हरले. त्यांचे वडील ज्योकीम आलेमाव हेसुद्धा दोन वेळा हरले. मात्र युरीने प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी आपले राजकीय भवितव्य घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गोवा फॉरवर्डमध्ये उडी मारली आणि संधी मिळताच गोवा फॉरवर्ड सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कुंकळ्ळीत निवडणूक लढविण्यासाठी घर घेतले.

आपले मत कुंकळ्ळी मतदारसंघात आणले. लोकांनी त्यांना ‘भायलो’ म्हणून हिणवले. मात्र ते मागे हटले नाहीत. परिणामी तब्बल तीन हजार मतांची आघाडी घेऊन ते विजयी झाले. ‘कोशिश करनेवालोंकी हार नही होती’ म्हणतात ते खरेच.

‘आरजी’चा उजो

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ या नवख्या युवकांच्या पक्षाने गोव्यातील राजकारणात प्रवेश करतानाच दमदार सुरुवात केली. सामाजिक विषय घेऊन राजकारणात उतरलेल्या पक्षाने वीरेश बोरकरसारखा तरणाबांड युवक आमदार म्हणून निवडून आणताना जितके उमेदवार गोव्यात उभे केले, त्या सर्वांनी विजय जरी मिळवला नसला, तरी पहिल्याच खेपेला लक्षणीय मते प्राप्त करीत सर्वच राजकीय पक्षांना चिंतन करायला भाग पाडले आहे.

32 वर्षांपूर्वी भाजपलासुद्धा इतके मताधिक्य पहिल्या निवडणुकीत मिळाले नव्हते. एका आमदारासह गोवा राज्यातून भरघोस मते प्राप्त करीत यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे. या मतांचा विचार केल्यास या पक्षाला भविष्य असल्याचे दिसून येते. आज ही ठिणगी आहे. उद्या वणवा तर पेटणार नाही ना?

विश्‍वजीत राणेंची राज्यपालांशी भेट

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अद्यापही भाजपने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. परंपरेनुसार हा दावा विधिमंडळ गटनेते करतात. तत्पूर्वीच आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता आपली ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती आणि राज्यपालांच्या प्रति कृतज्ञता दर्शवणारी होती, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र, अशा वैयक्तिक भेटीचे निमित्त नेमक्या यावेळेलाच कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या घटनेच्या पडद्यामागचे सत्य लवकर बाहेर येईलच. मात्र, मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राज्यपालांची घेतलेली भेट चर्चेला उधाण आणणारी आहे.

झुंडशाही बरी नव्हे!

‘विजयाने हुरळून जाऊ नये आणि पराभवाने खचू नये’ असे मराठीत एक बोधवाक्य आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या काही नवनिर्वाचित आमदारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जो धिंगाणा घातला, त्याला सभ्य समाजात स्थान नाही, असेच म्हणावे लागेल. ताळगाव मतदारसंघातून विजयी झालेल्या माजी मंत्री जेनिफर यांनी त्यांच्या विरोधात काम केलेल्या दत्तप्रसाद नाईक यांच्या घरापुढे जो धिंगाणा घातला, तो जगाने पाहिला. युरी आलेमाव समर्थकांनी बहीण वारल्याच्या दुःखात असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या घराजवळ चक्क फटाके वाजवले. तर क्लाफास समर्थक मारियो मोराईस यांच्या अंगणात फटाके फोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली. आपण अशांना एवढेच सांगू शकतो, ‘आयज म्हाका, फाल्या तुका.’

TMC
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा यंदा दाबोळी मतदारसंघातून उभे

‘युगोडेपा’च्या दुकानाला टाळे

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीने ‘आरजी’ वगळता राष्ट्रीय पक्षांच्या बाजूने कौल दिला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ‘आरजी’ला जरी प्रथमच एक जागा मिळालेली असली तरी मगो व गोवा फॉरवर्ड या अन्य दोन पक्षांच्या केवळ जागाच घटल्या नाहीत, तर त्यांची मतांची टक्केवारीही कमी झालेली दिसून येते. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर धडपडणाऱ्या युगोडेपा या दुसऱ्या एका प्रादेशिक पक्षाचे अस्तित्वच या निवडणुकीत दिसून आले नाही. त्यांचे अध्यक्ष असलेले डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांनी धरलेली तृणमूल कॉंग्रेसची वाट, हे तर त्यामागील कारण नसेल ना?

बाबूशची दादागिरी

विधानसभा निवडणुकीदरम्यान माध्यम प्रतिनिधी दिसताच थांबून माहिती देणारे बाबूश मोन्सेरात निवडणूक जिंकल्यानंतर मात्र, माध्यम प्रतिनिधींना धुडकावून लावताना दिसत आहेत. त्यांच्यात झालेला हा आमूलाग्र बदल नेमके कशाचे प्रतीक आहे, हे समजायला मार्ग नाही. ते स्वत: पणजीतून आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात या ताळगावमधून निवडून आल्या आहेत. निकाल लागताच आपल्याला आणि पत्नीला भाजप कार्यकर्त्यांनी साथ दिली नसल्याचा आरोप करत बाबूश खूपच तापलेले दिसत होते.

निवडणुकीतला हा राग ते आता माध्यम प्रतिनिधींवर काढताहेत का? हे मात्र अद्याप समजलेले नाही. पणजीत शनिवारी पक्षाच्या बैठकीतून बाहेर आल्यावर बाबूश यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना नेहमीच्या पद्धतीने उत्तरे न देता तिरकस उत्तरे देणे पसंत केले. हा राग पक्षावरचा तर नाही ना?

TMC
पणजीत नव्या महापौरांच्या नावाची चर्चा

काणकोणात साटेलोटे

राज्यात भाजपला बहुमत मिळाल्याने तेच सरकार स्थापन करणार, याची शंभर टक्के खात्री भाजपबरोबरच कॉंग्रेसच्या नेत्यांचीही झाली आहे. काणकोणमधून माजी मंत्री रमेश तवडकर निवडून आले. 2012 ते 2017 या कालावधीत भाजपच्या सरकारच्या कारकिर्दीत ते मंत्री होते. आता मतदारसंघाचा जलदगतीने विकास होण्यासाठी तवडकर यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, ही मागणी दुसरा तिसरा कोणी करत नसून विधानसभा निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार जनार्दन भंडारीच स्वत: करत आहेत. त्यामुळे तवडकर आणि भंडारी यांचे काही साटेलोटे तर नाही ना? अशी चर्चा काणकोणात सुरू आहे. ∙∙∙

झुंडशाही बरी नव्हे!

‘विजयाने हुरळून जाऊ नये आणि पराभवाने खचू नये’ असे मराठीत एक बोधवाक्य आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या काही नवनिर्वाचित आमदारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जो धिंगाणा घातला, त्याला सभ्य समाजात स्थान नाही, असेच म्हणावे लागेल. ताळगाव मतदारसंघातून विजयी झालेल्या माजी मंत्री जेनिफर यांनी त्यांच्या विरोधात काम केलेल्या दत्तप्रसाद नाईक यांच्या घरापुढे जो धिंगाणा घातला, तो जगाने पाहिला.

युरी आलेमाव समर्थकांनी बहीण वारल्याच्या दुःखात असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या घराजवळ चक्क फटाके वाजवले. तर क्लाफास समर्थक मारियो मोराईस यांच्या अंगणात फटाके फोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली. आपण अशांना एवढेच सांगू शकतो, ‘आयज म्हाका, फाल्या तुका.’

लिडरनेच केला घात

कॉंग्रेसमधून नऊ आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या दक्षिण गोव्यातील एका नेत्याच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीविषयी या नऊ आमदारांपैकी काहीजण शंका घेऊ लागले आहेत.

मधल्या काळात ‘वादग्रस्त’ प्रकरणामुळे गोत्यात आलेल्या या नेत्याने ज्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या, त्यावेळी अन्य आमदारबंधूंना उमेदवारी मिळवून देण्यात काहीच हातभार लावला नाही, अशी खंत ते व्यक्त करत आहेत. आम्हाला उमेदवारी नाही ते नाहीच, शिवाय स्वत:ही नवख्या उमेदवाराकडून पराभूत झाले. त्या नेत्याच्या मतदारसंघातील मतदारांनीच तर त्यांना धडा शिकवला नाही ना, अशी शंका त्या नऊपैकी काहीजण घेऊ लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com