

पणजी: शापोरा नदीच्या मुखाशी सध्या यंत्रांच्या साहाय्याने गाळ उपसण्याचे काम सुरू असून या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या तीव्र लहरी व मोठ्या आवाजामुळे मोरजीच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या समुद्री कासवांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भागात दीर्घकाळ संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी गाळ उपसण्याचे काम किमान दोन महिने पुढे ढकलण्याची स्पष्ट शिफारस केली आहे.
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, कासवे अंडी घालण्याच्या सुमारे महिनाभर आधी समुद्रालगतच्या पाण्यात, विशेषतः उपसागर आणि नदीमुख परिसरात वास्तव्यास येतात. त्यामुळे शापोरा नदीच्या मुखाकडील समुद्री भाग हा कासवांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला गेला पाहिजे.
सध्या सुरू असलेल्या गाळ उपशामुळे पाण्यातील नैसर्गिक हालचाली बदलत असून, यंत्रांच्या कंपनांमुळे निर्माण होणारा आवाज कासवांच्या स्थलांतराच्या व अंडी घालण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
तज्ज्ञांनी मांडले वैज्ञानिक सत्य...
तज्ज्ञांनी अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक सत्याप्रमाणे, समुद्री कासवे ज्या किनाऱ्यावर जन्माला येतात, त्याच किनाऱ्यावर पुन्हा अंडी घालण्यासाठी परत येतात. या पार्श्वभूमीवर, गेल्या सुमारे ३० वर्षांत मोरजीच्या किनाऱ्यावर जन्मलेल्या कासवांची पिढी पुन्हा याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणार, हे निश्चित मानले जाते. त्यामुळे मोरजी किनाऱ्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधिक ठळक होते.
गाळ उपसा हा विकासाच्या दृष्टीने आवश्यक असू शकतो; मात्र तो योग्य काळात व पर्यावरणपूरक पद्धतीनेच करण्यात यावा. कासवांच्या प्रजनन हंगामात अशा स्वरूपाची कामे सुरू ठेवणे जैवविविधतेस गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी वैज्ञानिकांच्या सूचनांचा विचार करून गाळ उपसण्याचे काम दोन महिने पुढे ढकलावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.