Goa BJP: आलेक्स सिक्वेरांचा मंत्रिमंडळातील समावेश तहकूब; तर मुख्यमंत्र्यांना ‘थांबा आणि वाट पाहा’ आदेश

दिगंबर कामत यांचे दिल्लीमध्ये लॉबिंग
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नवी दिल्लीत जबरदस्त लॉबिंग केल्याने आलेक्स सिक्वेरा यांचा मंत्रिमंडळातील समावेश तहकूब झाला असून मुख्यमंत्र्यांना ‘तूर्तास नवीन सूचनेची वाट पाहा’ असा संदेश पक्षश्रेष्ठींनी पाठवला आहे. दिगंबर कामत यांना स्वत:ला मंत्रिपद हवे आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी आज (शनिवारी) ‘गोमन्तक’ला सांगितले की, गेल्या सप्टेंबरमध्ये कॉंग्रेस पक्षाला भगदाड पाडून आठजणांचा एक गट भाजपमध्ये प्रवेशकर्ता झाला, तेव्हा आपल्याला मंत्रिपद नको, अशी भूमिका कामत यांनी घेतली होती.

परंतु नव्या राजकीय घडामोडींनुसार, कामत यांना आता स्वत:चा मंत्रिमंडळात समावेश हवा असून त्यासाठी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिल्यास पक्षाला काहीही फायदा होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामत यांनी गेल्या दोन महिन्यांत दिल्लीच्या दोन-तीन वाऱ्या केल्या असून या काळात आपली बाजू ठळकपणे मांडताना गोव्यातील सरकारच्या कामगिरीचा आलेख मांडला, जो पक्षश्रेष्ठींना पसंत पडला.

त्यामुळेच त्यांच्यात आणखी बैठका होऊ लागल्या व त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शपथविधी रोखण्याच्या सूचना आल्या.

वास्तविक प्रमोद सावंत यांनीच गेल्या महिन्यात ‘गोमन्तक’शी बोलताना एकच मंत्री - आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे सूतोवाच केले होते व त्यासाठी त्यांना पक्षश्रेष्ठींकडून मान्यता मिळाल्याचे पक्षाच्या सूत्रांनी मान्य केले होते.

या घटनेची चाहूल लागल्याने आलेक्स सिक्वेरा सध्या विलक्षण नाराज झाले असून हातचे सोडून पळत्याच्या मागे लागल्याची त्यांची भावना झाली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास मानसिकदृष्ट्या तयारच नव्हते. परंतु कामत यांनी त्यांना मंत्रिपदाची ग्वाही दिली होती, असे विश्‍वसनीय सूत्रांनी या प्रतिनिधीला सांगितले.

दिगंबर कामत हे माजी मुख्यमंत्री असणे, प्रभावी सारस्वत समाजाचा त्यांना पाठिंबा, अनेक मंत्रिपदांचा कार्यकुशल अनुभव व दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत लाभ होण्याची शक्यता, या कामत यांच्या जमेच्या बाजू असून आलेक्स सिक्वेरांच्या मंत्रिपदामुळे सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा मिळणे कठीण आहे, असे गणित पक्षश्रेष्ठींपुढे मांडण्यात आले आहे.

परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कामत यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत फारसा उत्साह नाही, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात.

आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेतल्यास त्यांची एक-दोन छोट्या खात्यांवर बोळवण करता येईल, परंतु कामत यांची वर्णी लागल्यास पक्षश्रेष्ठी स्वत:च हस्तक्षेप करून त्यांना महत्त्वाची खाती देण्याचा आग्रह धरतील.

Goa BJP
Dupatta Serial Killer महानंद नाईक प्रकरण; अखेर पिडित महिलेला पोलिसांचे संरक्षण

कारण मंत्रिमंडळात ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचा मान राखावा लागेल, तसा दबाव मुख्यमंत्र्यांवर येऊ शकतो, याची जाणीव प्रमोद सावंत यांना आहे.

दिगंबर कामत यांना वजनदार खाती द्यावी लागल्यास मंत्रिमंडळाचा तोल ढासळू शकतो व आपल्याला राज्यशकट हाकण्यात नव्या अडचणींना सामोरे जाण्याची भीती सावंत यांना आहे.

शिवाय विश्‍वजीत राणे व इतर काही मंत्री दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशास विरोध करतात. कामत यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दलही राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

परंतु या पार्श्‍वभूमीवर प्रमोद सावंत यांनी तूर्त कोणत्याही हालचाली न करता ‘थांबा व वाट पहा’ अशीच भूमिका स्वीकारली आहे.

Goa BJP
'औ' म्हणजे औरंगजेब! कोकणी अंकलिपीतील उल्लेखामुळे गोव्यात नवा वाद

कामतांबाबत काही मंत्री, आमदार आग्रही

दुसऱ्या बाजूला विश्‍वजीत राणे यांच्या कार्यशैलीबाबत नाराज असलेले काही मंत्री व आमदार कामत यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत सूत्रे हलवू लागले असल्याची माहिती आहे.

बाबूश मोन्सेरात यांनी पीडीएमध्ये स्वत:ला जादा अधिकार मिळावेत, या भावनेने कामत यांना मंत्रिमंडळात घेऊन टीसीपी खाते मिळावे, असे वाटते. परंतु पणजीतील राजकीय परिस्थिती व राजधानी पणजी शहरातील नजीकच्या घटना यांमुळे पक्षश्रेष्ठी मोन्सेरात यांच्याबद्दलच अनुकूल नाहीत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने त्यांना एकदमच सोडून दिले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या पुत्राला ज्या पद्धतीने उमेदवारी नाकारण्यात आली, त्याबद्दल पक्षश्रेष्ठी नाराज झाले आहेत. त्यात बाबूश मोन्सेरात यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निरुत्साह दर्शविला आहे.

Goa BJP
37th National Games: गोमंतकीयांना आता प्रतीक्षा ‘MOGA’ची

बाबूश यांची स्वतंत्र व्यूहरचना

पक्षाचे आजी-माजी आमदार पंतप्रधानांच्या ९ व्या वर्षसोहळ्याचे कार्यक्रम साजरे करण्यात दंग असता, मोन्सेरात पती-पत्नी मात्र अलिप्त आहेत. ते प्रदेशाध्यक्षांचे फोनही स्वीकारत नाहीत, अशी चर्चा आहे.

मोन्सेरात यांचे राजकीय भवितव्य फार फार तर लोकसभा निवडणुकीपर्यंतच अबाधित राहील. नंतर मंत्रिमंडळात बदलाचे संकेत मिळतात. बाबूशनाही स्थितीचा अंदाज आल्याने ते स्वत:ची वेगळी व्यूहरचना तयार करू लागले आहेत.

विश्‍वजीत राणे अलिप्त

राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना टीसीपी मंत्री विश्‍वजीत राणे यांचे लक्ष मात्र गोव्यात नाही. त्यांच्या मातोश्री आजारी असून त्या मुंबईत उपचार घेत आहेत.

त्यामुळे राणे यांच्या मुंबईतील गाठीभेटी वाढल्या आहेत. मंत्रिमंडळ सदस्यांच्या चिंतन बैठकीत भाषण केल्यानंतर तेथे पूर्णवेळ न थांबता ते मुंबईला निघून गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com