
Amit Palekar Alleges Congress Leader About India Alliance
पणजी: राज्यात ‘इंडिया’ आघाडी संघटित आहे, परंतु मागील काही दिवसांपासून आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून जे काही घडत (आरोप-प्रत्यारोप) आहे, ते योग्य नाही. काँग्रेस पक्षातील काहीजणांना ‘इंडिया’ आघाडी नको आहे असे आपणास वाटत असल्याचा संशय आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की आम्ही दिल्लीला ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आम्ही काँग्रेसच्या काही दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांची भेटही घेतली. त्यांच्या कानावर गोव्यातील आघाडीविषयीची माहिती घातली असून त्यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून संवादाचा अभाव असल्याचे आढळून आले.
आम्ही आमच्या पक्षाच्याही नेत्यांकडे गोव्यातील स्थिती सांगितली. गोव्यातील लोकांना आघाडी झालेली हवी आहे, पण जर काही लोक त्यात खोडा घालून आघाडी तोडण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते योग्य नाही. आपण काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दोष देत नाही. आघाडीचा धर्म पाळताना निवडणुकीवेळी त्याग करावा लागतो. शनिवारी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने पक्ष बळकट करण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले ते खरे आहे. आघाडीतील आमदार असलेल्या मतदारसंघात जाऊन तेथे निवडणूक लढविण्याची भाषा करतात, यावरून आघाडीवरील विश्वासाला तडा जाईल, असे सांगत पालेकर म्हणाले.
काँग्रेसच्या प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर या येतात आणि त्यांना घेऊन प्रदेशाध्यक्ष सर्वत्र फिरतात. बार्देशमध्ये जाऊन आम्ही ही निवडणूक लढविणार म्हणून सांगितले नाही. कुंभारजुवे मतदारसंघात जाऊन त्यांनी तेथे निवडणूक लढविणार असल्याचे का सांगितले नाही. बाणावली मतदारसंघ त्यांनी का निवडला आणि तेथे जाऊन निवडणूक लढविण्याची भाषा का केली. आघाडी तुटल्यास काँग्रेसलाच तोटा होईल. लोकसभेला साडेबारा हजार मतांनी कॅप्टन विरियातो विजयी झाले, आम्ही उमेदवार ठेवला असता तर काय झाले असते? असा सवाल पालेकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.