

पणजी: मैदानावर जिंकण्यासाठी जिद्द आणि झुंझार वृत्ती कशी असावी याचे सुरेख प्रदर्शन मध्य प्रदेशचा अष्टपैलू सारांश जैन याने मंगळवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर प्रदर्शित केले. तो शेवटपर्यंत लढल्यामुळे पाहुण्या संघाने रणजी करंडक एलिट ब गट सामन्यात गोव्यावर तीन विकेट राखून मात केली.
मध्य प्रदेशसमोर सामना जिंकण्यासाठी ३२८ धावांचे लक्ष्य होते. रोमहर्षक ठरलेला सामना त्यांनी सात गडी गमावून जिंकला, तेव्हा सारांश ८२ धावांवर नाबाद होता. त्याने १३२ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार मारले. ७ बाद २६३ धावांवरून संघाला सावरताना त्याने यजमान गोलंदाजांचे वर्चस्व झुगारुन लावले.
सारांशने आठव्या विकेटसाठी अर्शद खान (नाबाद २५) याच्यासमवेत ७२ मिनिटांत १०० चेंडूंत ६५ धावांची अभेद्य भागीदारी करून गोव्याच्या विजयाच्या स्वप्नाला तडा दिला. सारांशच्या निर्धारपूर्वक फलंदाजीसमोर गोव्याची रणनीती फिस्कटली.
त्यातच ८०व्या षटकानंतर दुसरा नवा चेंडू घेतल्यानंतर प्रभावी ठरत असलेला डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याच्या हाती चेंडू न देणे गोव्यासाठी महागात पडले. गोव्याचे गोलंदाजीतील बदलही अनाकलनीय ठरले.
पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेऊनही यजमानांच्या वाट्याला पराभव आला. मध्य प्रदेशने स्टार खेळाडू रजत पाटीदार व व्यंकटेश अय्यर यांच्या अनुपस्थितीतही विजय मिळविला हे विशेष ठरले.
सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी मंगळवारी चहापानाला खेळ थांबला तेव्हा मध्य प्रदेशची ५ बाद २२१ अशी स्थिती होती व त्यांना विजयासाठी बाकी ३५.३ षटकांत १०७ धावांची गरज होती. गोव्याच्या गोलंदाजांना पकड घट्ट करत मध्य प्रदेशचा डाव गुंडाळता आला नाही, परिणामी पाहुण्या संघाने डावातील नवव्या अनिर्वाय षटकात विजयाला गवसणी घातली.
ललित यादव याच्या गोलंदाजीवर अर्शद खानने फाईन लेगला विजयी धाव घेतली आणि मध्य प्रदेश संघाने एकच जल्लोष केला. त्यांचा यंदा मोसमातील पहिला विजय ठरला.
त्यापूर्वी, सलामीच्या हर्ष गवळी (५४) याच्या अर्धशतकानंतरही मध्य प्रदेशची दुसऱ्या डावात ३ बाद १०६ अशी स्थिती झाली. कर्णधार शुभम शर्मा (७२) याने हरप्रीतसिंग भाटिया याच्यासमवेत किल्ला लढविला. मात्र दीपराज गावकर याचे शानदार क्षेत्ररक्षण व ऑफस्पिनर ललित यादवचा प्रभावी मारा यामुळे मध्य प्रदेशचे नुकसान झाले. दीपराजने सिली पॉईंटला हरप्रीतचा (३५) झेल पकडल्यामुळे चौथ्या विकेटसाठीची ७० धावांची भागीदारी संपुष्टात आली.
मध्य प्रदेशच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला सारांश जैन सामन्याचा मानकरी ठरला. इंदूर येथील या ३२ वर्षीय क्रिकेटपटू कौतुकास्पद अष्टपैलूत्व प्रदर्शित केले. या डावुखऱ्या फलंदाजाने पहिल्या डावात ४८, तर दुसऱ्या डावात नाबाद ८२ धावा केल्या. ऑफस्पिन गोलंदाजीत प्रभावी ठरताना दोन्ही डावांत मिळून सहा गडी (४-७८ व २-६४) बाद केले.
स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर एलिट ब गटात मध्य प्रदेशचे सर्वाधिक १५ गुण झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकचे ११ गुण असून गोवा, महाराष्ट्र, पंजाबचे प्रत्येकी ११ गुण झाले आहेत. सौराष्ट्रचे सहा, तर केरळचे पाच गुण आहेत. चंडीगडच्या खाती फक्त एक गुण आहे. गोव्याचा स्पर्धेतील पुढील चार दिवसीय सामना १६ नोव्हेंबरपासून सौराष्ट्रविरुद्ध राजकोट येथे खेळला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.