

महात्मा गांधीजींचे एक ज्येष्ठ सहकारी पंडित मोतीलाल नेहरू यांचे पुत्र म्हणून जवाहरलालजींनी भारताच्या राजकारणात पदार्पण केले आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर तत्कालीन अग्रगण्य राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेत त्यांचे नाव झळकू लागले. जवाहरलाल हे गांधीजींचे निष्ठावंत शिष्य होते, पण विद्यार्जनासाठी अनेक वर्षे विलायतेत राहिल्यामुळे आधुनिक पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता, त्या विचारसरणीचा पुरस्कार प्रथमच कॉंग्रेसमध्ये आणि देशामध्ये त्यांनी प्रभावीपणे केला.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर येथे खऱ्या अर्थाने ’स्वराज्य’ निर्माण व्हावे व तमाम भारतीय जनतेचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे म्हणून आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे, हे हेरून स्वातंत्र्यपूर्व काळातच हे सत्य त्यांनी कॉंग्रेस (Congress) नेत्यांच्या गळी उतरविले व देशाच्या भावी नियोजनाचा आराखडाही कॉंग्रेसच्या योजना समितीचे अध्यक्ष या नात्याने १९३८साली तयार करून नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून तो यशस्वीपणे पुढे नेण्याचे काम केले.
विशेष म्हणजे देशामधल्या सगळ्या परकीय भांडवलाचे नि सगळ्या मूलभूत उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण करणे, जमीनदारशाही नष्ट करून कसेल त्यांची जमीन करणे, देशाला ‘सुजलाम् सुफलाम्’ करून देशाला आधुनिकतेकडे वळवा यासारख्या क्रांतिकारक सूचना त्या आराखड्यात करून त्या पूर्णत्वास नेण्याचे काम त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात केले आणि मग हा आधुनिकेतचा, देशाच्या सर्वांगीण उन्नतीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम त्यांनी कन्या श्रीमती इंदिरा गांधी आणि नातू राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात पार पाडून देश खऱ्या अर्थाने इतर देशाच्या तुलनेत कमी पडणार नाही, याची दखल घेतली.
पंडित नेहरूंनी आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला असा एक आगळा नि वेगळा ठसा उमटविला. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह, अहिंसा, शीलता या त्रिसूत्रीनुसार आपला ठसा उमटवून जागतिक शांतिदूत म्हणून कीर्ती मिळाली खरी, पण आंतरराष्ट्रीय राजकारणातील शांततावादित्वाच्या अतिरेकामुळे त्यांनी पाकिस्तानी आक्रमकांपुढे काश्मीरसारख्या प्रश्नात नमते घेतले, तसेच चिनी आक्रमणविषयी गाफील राहिले म्हणून त्यांच्याबद्दल गैरसमजही पसरले, पण आपल्या जहाल वृत्तीमुळे पुढे त्यांनी पाकिस्तानला अनेक बाबतीत धडा शिकविला व चीनचीही नांगी मोडण्याचा प्रयत्न केला.
’पंचशील’ हे पंडित नेहरूंचे एक महान स्वप्न होते. आणि हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांनी आपली शक्ती, मुत्सद्देगिरी पणाला लावली होती. दोन भीषण महायुद्धांमध्ये भाजून पोळून निघालेले जग पुन्हा तिसऱ्या महायुद्धाच्या गर्तेत होरपळले जाऊ नये, ही उदात्त भावना त्यामध्ये होती आणि आपल्या उभ्या हयातीत ते त्यासाठी प्रयत्नशील राहिले. आज युक्रेन, रशिया युद्ध, इराण-इस्राइल-अमेरिका युद्ध यांच्या ज्या झळा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या जगाला टोचत आहेत, ते पाहिल्यानंतर पंडित नेहरू यांचे पंचशील आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय धोरण यांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पंडित नेहरू एक स्वातंत्र्यसैनिक, कॉंग्रेसला तळा-गाळापर्यंत नेणारे नेते, जागतिक कीर्तीचे लेखक आणि काव्य, शास्त्र, विनोदात रमणारे रसिकराज होते.
आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने आमच्या देशाचे आधुनिक भारताचे शिल्पकाक म्हणून गणले गेलेले, पं. नेहरू यांची अखेरची इच्छा काय होती बरे? त्यांनी आपल्या मृत्युपत्रात नमूद केले होते की, ’माझ्या मृत्यूनंतर माझ्या रक्षेमधला चिमुकला अंश - आपल्या जन्मगावी अलाहाबाद येथे गंगेमध्ये विसर्जित करावा, म्हणजे तो रक्षेच्या अंश वाहत जाऊन भारताच्या किनाऱ्यांना स्नान घालण्यासाठी सागराला मिळेल. माझी उरलेली रक्षा जेथे शेतकरी कष्टतात अशा शेतांमध्ये विमानातून विखरावी म्हणजे माझ्या देशाच्या भूमीशी ती एकरूप होईल.
पं. नेहरूंनी आपल्या मृत्युपत्रात व्यक्त केलेली ही उदात्त व हृदयद्रावक भावना एका महाकवीलाच साजेशी आहे, असेच म्हणावे लागेल. आचार्य अत्रे यांनी पं. नेहरूंच्या निधनानंतर ’स्वातंत्र्यसूर्य मावळला’ असा आपल्या अग्रलेखात उल्लेख करीत म्हटले होते, ’भारताचे पंतप्रधान गेले. जवाहरलाल नेहरू गेले ही भयानक वार्ता आमच्या कानावर आदळली आणि काही काळ आमचा मेंदू बधिर झाला. आमचे हृदय गोठण्याचा आम्हाला भास झाला. आमच्या साऱ्या चैतन्यशक्तीच लुप्त झाल्यासारखे आम्हाला वाटू लागले. बराच वेळपर्यंत या वार्तेवर आमचा विश्वासच बसेना’.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.