

पणजी: वंदे मातरम् गाण्यापासून युवांनी प्रेरणा घ्यावी आणि ज्या देशाने आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्याच्यासाठी जगावे. भारताच्या प्रगतीसाठी तसेच २०४७च्या विकसित भारताच्या स्वप्नासाठी जगा. तरुणांसाठी अनेक संधी आहेत. राष्ट्राच्या स्वप्नांद्वारे तुमची स्वप्ने पूर्ण करा आणि राष्ट्रनिर्माते बना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले.
भारताच्या राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळालेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या १५०व्या वर्षभराच्या स्मरणोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कला अकादमी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, कला आणि संस्कृती सचिव संतोष सुखदेवे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, कला आणि संस्कृती संचालक विवेक नाईक, सरकारी अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.
सुरवातीस सर्वांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’ हे गीत गायले. कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर वाद्यगीते सादर केली. कला आणि संस्कृती सचिव सुखदेवे यांनी स्वागत केले आणि ‘वंदे मातरम’ हे गीत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील लाखो भारतीयांचे एक युद्धगीत होते आणि १५०व्या वर्धापनदिनाचा स्मरणोत्सव वर्षभर सुरू राहील, असे सांगितले.
याप्रसंगी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ हे गाणे समाविष्ट होते. नंतरतर नवी दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट भाषण उपस्थितांना दाखविण्यात आले.
या गाण्याची प्रत्येक ओळ आपल्या भारतमातेची स्तुती करते आणि हे गाणे आजही आपल्याला भारताला एकत्र आणण्यासाठी प्रेरित करते, जो भारत एवढा वैविध्यपूर्ण आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम’मधून प्रेरणा घेतली आणि देशासाठी आपले प्राण दिले.
आज पेडणेपासून काणकोणपर्यंत सर्वांनी ‘वंदे मातरम’ हे गाणे गायले आहे. हे गाणे आपल्या देशाच्या हृदयाचे ठोके बनले आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणारे आहे, ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘वंदे मातरम्’ हे देशभक्ती व भावना जागृत करणारे गीत आहे. या गीताबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगावा. तसेच गीतामधून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे मत आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केले.
‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपतर्फे आज (शुक्रवारी) राज्यभर ‘वंदे मातरम्’ पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्रभावना जागृत करणारा मंत्र आहे. या गीताने अभिमान व स्वाभिमान जागृत होतो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरणा देणारा हा मंत्र असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व एनआरआय कमिशनर नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.