

मधू य. ना. गावकर
पावसाचा प्रत्येक थेंब हा मानवाचीच नव्हे तर संपूर्ण जैवविविधतेची मोठी संपत्ती आहे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळाल्याने माणसाला उर्जा देणारे अन्न पिकते, त्याने समृद्धी वाढते. मानव सोने, चांदी, मोती, हिरे, अशा भूमीमधील धातूंना, कागदी चलनाला महत्त्व देतो. पण धातू हा जमिनीतील पाण्यामुळेच तयार झालेला आहे, आपल्या भविष्याची खरी संपत्ती पाणी आहे, हे विसरत चालला आहे.
दरवर्षी येणारा नैऋत्य मान्सून आपल्या देशाला काळ्या घटांनी पाणी भरून घेऊन येतो, त्या पाण्याने नद्या, नाले, तलाव, सरोवरे तुडुंब भरून वाहू लागल्याने ते पाणी शेतात भरते. पावसासाठी आकाशाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा कपाळावरील हात खाली येतो. निसर्ग आपल्याला उदारपणे देतो, म्हणून आपण त्याला सांभाळला पाहिजे. ज्या पाण्याला माणसाने देवत्व दिले, वाहणाऱ्या नद्यांना माता मानल्या.
विहिरी, तलाव पूज्य मानले, त्यातील पाण्याला योग्यरीतीने वापरण्याची जबाबदारी मानवाची आहे. पाणी स्वच्छ राखणे ते वाचवणे हा पर्यावरणीय उपक्रम नाही, ते प्रत्येकाचे कर्तव्य बनायला हवे. वृक्ष, डोंगर, नद्या, ओहळ, दऱ्या, झरे यांच्यामुळे भूजल साठते, म्हणून ते निसर्गाचे भांडार आहे. हे सारे काम निसर्गातील वातावरणाचे घटक करतात, त्याने जमिनीची आर्द्रता राखून भूजलात वाढ होते. आज हवामान बदलाने दरवर्षी पडणारा पाऊस कधी कधी अतिवृष्टी करतो, तर कधी दीर्घकाळ दडी मारतो.
पावसाचा प्रत्येक थेंब हा मानवाचीच नव्हे तर संपूर्ण जैवविविधतेची मोठी संपत्ती आहे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळाल्याने माणसाला उर्जा देणारे अन्न पिकते, त्याने समृद्धी वाढते. मानव सोने, चांदी, मोती, हिरे, अशा भूमीमधील धातूंना, कृत्रिम काल्पनिक कागदी चलनाला महत्त्व देतो. पण धातू हा जमिनीतील पाण्यामुळेच तयार झालेला आहे, आपल्या भविष्याची खरी संपत्ती पाणी आहे, हे विसरत चालला आहे.
दरवर्षी येणाऱ्या पावसाचे आगमन ही हवामानाची हजेरी नसून तो मानवीय संकृती घडण्याचा सर्वात मोठा उत्सव आहे. ज्यावेळी नैऋत्य मान्सून आपल्या देशाच्या दक्षिण सीमेवरील तीन महासागरांच्या संगमावरील तटाला धडक देतो. तेव्हा संपूर्ण देशात आशेचे वातावरण निर्माण होते. सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या जैवीक संपत्तीला नवसंजीवनी मिळणार या आशेने मानव खूष होतो. शेतकरी शेताकडे धाव घेतो, सरकारी संस्था, कार्यालये, शाळा, हायस्कूल, कॉलेज ही मानवीय मंदिर, वृक्षारोपणाच्या तयारीला लागतात.
झाडांच्या वाढीने प्राणवायूत मोठ्या प्रमाणात भर पडते, झाडांमुळे हवामानातील उष्मा कमी होऊन जमिनीचे रक्षण होते. एकविसाव्या शतकात मानवी विकासाच्या क्रांतीने, डोंगर, पठारे, दऱ्या, माळराने सर्वत्र भूमीतून कोळसा, मँगनीज, आयर्न, सोने, रूपे, पाषाण, जांभा दगड उसपा केला जातो. शेती, पाणथळ जागा बुजवून बंगले, महाप्रकल्प उभारल्याने त्याचा वाईट परिणाम होऊन पर्यावरणावर मोठे संकट उभे राहिले आहे.
त्या संकटातून बाहेर पडून पुढच्या भविष्यासाठी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने घेऊन शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा मार्ग स्वीकारल्यास निसर्गही सराकात्मक पाऊल उचलेल. हे हवामान, पाऊस, निसर्ग, पर्यावरण आणि कृषीचे विचारमंथन होत असता स्कुटरने कधी कालवी बेटावरील भावकई परिसरातील पुलाकडील रेल्वे रुळ पार केला, हे कळले नाही. बेटावर प्रवास करताना पावसाने हजेरी लावली, त्याची सलामी झेलत कालवी बेटावरील निसर्गाची माहिती घेऊ लागलो.
मांडवीच्या दोन उपनद्यांच्या मध्ये चोडण आणि खोर्जुवे या दोन बेटांच्या मध्ये आपल्या लहान भावंडाचा हात धरून कालवी बेटाला सांभाळण्याचे काम ती करतात. उत्तर बाजूने खोर्जुवे आणि दक्षिण बाजूने चोडण यांना वेगळे करण्याचे काम मांडवीच्या पोम्बुर्पा आणि अस्नोडाच्या पार उप नद्यांनी त्या तीन बेटांना छेदून वेगळी केली आहे. कालवी बेटाच्या पूर्वेस अस्नोडा नदी आणि पश्चिमेस पोम्बुर्पा नदी आहे, कालवी बेट अती संवेदनशील म्हणून ओळखले जाते.
झिंगे, खेकडे, वागी, शेवटा, चोणकूल, काळुंद्र, शेतुक, खरचाणी, तामसा, पालू अशी रुचकर मासळी मांडवीच्या सर्वच बेटांवर मिळते, ही बेटे मत्स्य धनाचे कोठार असून बार्देस, तिसवाडी, फोंडा, डिचोली तालुक्यातील शहरी भागात आणि परिसरातील गावांत ती मासळी धन पुरवून मानवी जीवन जगवतात. कालवी बेटावर हल्लीच्या काळात दोन पूल उभारून म्हापसा- डिचोली जाण्यास अंतर जवळ आणले आहे.
पूर्वकाळी या बेटावर जाण्या-येण्यास वायंगीणे, बावकई, कालवी, सडोती चोडण, आणि पोम्बूर्पा या ठिकाणी होडीने जाण्या-येण्यास नाविक मार्ग होते. पन्नास वर्षांपूर्वी पणजी शहराकडे जाण्यास लॉन्च (वाफोर) चालत होते, ते मांडवी पात्रांतून बिठ्ठोण, वरांडा, एकोशी, बेलभाट, पोम्बुर्पा, कारोना, आंबाडी, कालवी आणि हणदोणा परिसरातील लोक मांडवीच्या पोम्बुर्पा उपनदीतून प्रवास करीत होते. कालवी बेटाला पोनोळे, पिकेन कालवी नावांनी संबोधतात. कालवी बेटावरील वर्तुळाकार शेती खाजन असल्याने तिथे लोक पावसाळ्यात पेरणी करीत होते.
कालवी बेटावर मानकूर, कुलास, फेर्नांद, साकरीन, मालगेस गोड आंबे देणारी झाडे प्रत्येकाच्या दारी पहावयास मिळतात. त्यात मधुर सुवासिक दरवळ देणारा रसाळ फणस आपले रूप दाखवतो. अजब म्हणावे असे हे बेट लहान असूनही त्या बेटावर करवंद, कणेर, फातरफळ पिटकळ, चुरन, बकुळ, जांभुळ औषधी रानमेवा झाडे पहावयास मिळतात. बेटावर पंख्याच्या वाऱ्याप्रमाणे वाहणाऱ्या नैसर्गिक वाऱ्याची झुळूक शरीरातील थकवा दूर करते.
जगभरात कैक बेटे आहेत, त्या बेटांवर जाण्यास त्या, त्या देशातील सरकारांनी पर्यावरणीयदृष्ट्या बंदी घातली आहे. मात्र, गोव्यातील मांडवी नदीच्या पात्रातील बेटावर आज खनन करून विला, बंगले, सदनिका उभारलेल्या पहावयास मिळतात, ही खरी धोक्याची घंटा आहे. कालवी बेटावरील प्रवास संपून घरी परतताना जुन्या फेरी धक्क्यावर पोहचलो, आणि नदी दुर्घटनेत १८ फेब्रुवारी २०१२ रोजी चार शाळकरी मुले आणि दोन वयस्क माणसे बुडून मेल्याची समाधी पाटी वाचून दुःखी झालो, कारण भविष्य घडवणारी माणसे आज आपल्यात नाहीत. त्यांना अभिवादन करून घरचा रस्ता धरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.