

डॉ. नाऊ वरक
२०२२ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाने सावंत यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेत नवख्या तृणमूल काँग्रेसशी युती केली. निवडणुकीनंतर मात्र भाजपने वैचारिक मित्रत्वाच्या नात्याने मगोला पुन्हा सत्तेत सामावून घेतले. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई गेली ६-७ वर्षे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र निवडणुकीला सुमारे ४ ते ५ महिने असूनदेखील गोवा फॉरवर्डच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही. काँग्रेसला सध्या ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’ निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.
भाऊसाहेब बांदोडकर, जॅक सिक्वेरा आणि मनोहर पर्रीकर हे गोव्यातील ‘करिष्मा’ असलेले राजकीय नेते होते. पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्याच्या राजकारणात ‘करिष्मा’ असलेले राजकीय नेतृत्व सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही. २०१९ नंतर सदानंद तानावडे, गिरीश चोडणकर, विजय सरदेसाई, प्रमोद सावंत, आणि दामू नाईक हे पन्नाशीतले प्रमुख चेहरे राजकीय नेतृत्व म्हणून राजकीय पटलावर झळकू लागले. हेच नेते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहेत. म्हणून गोव्यातील बदलत्या नेतृत्वाचा आढावा आजच्या लेखात घेतला आहे.
मार्च २०१९ मध्ये प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरातच सदानंद तानावडे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. मनोविश्लेषणातील ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’च्या सिद्धांतानुसार जर नवख्या व्यक्तीवर विश्वास आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या तर ती व्यक्ती प्रामाणिकपणे काम करून असाध्य गोष्टी साध्य करते. ग्रीक आख्यायिकेनुसार, पिग्मॅलिअन त्याने स्वतःच बनविलेल्या शिल्पाच्या इतका प्रेमात पडला की, ते शिल्प जिवंत झाले. असेच काही प्रमोद सावंत यांच्या बाबतीत घडले.
सावंत मुख्यमंत्रिपदाच्या एवढे प्रेमात पडले,की त्यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २० जागा मिळवून दिल्या आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. तानावडेही भाजपच्या यशाचे शिल्पकार तेवढेच आहेत. उत्तर गोव्याचा भाजपच्या यशात सिंहाचा वाट असतो. राजेंद्र आर्लेकर, विनय तेंडुलकर व दामू नाईक वगळता आत्तापर्यंत बरेचसे भाजप प्रदेशाध्यक्ष हे उत्तर गोव्यातले आहेत. आर्लेकर व तेंडुलकर प्रदेशाध्यक्ष असताना भाजपला २०-२१ जागा मिळवता आल्या नाहीत.
सध्याचे अध्यक्ष दक्षिण गोव्यातले असल्याने पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर तानावडे-सावंत या जोडीच्या सक्रियतेची भाजपला गरज आहे. २०२२ विधानसभा निवडणूक निकालानंतर काही दिवसांतच नवख्या अमित पाटकर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाली. तर काही महिन्यांत युरी आलेमाव यांना विधानसभेचे विरोधीपक्षनेते म्हणून मान्यता मिळाली. पाटकर आणि आलेमाव हे नेतृत्वाच्या दृष्टीने नवखेच होते मात्र सावंतांप्रमाणे त्यांच्यामध्ये ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’ पाहायला मिळाला नाही.
सामाजिक कार्यकर्ते व आरजी पक्षाने काढलेले मोर्चे व आंदोलने यांना पाठिंबा देण्याचे काम यांच्या कारकिर्दीत पाहायला मिळाले. यातच पाटकर यांचे हळदोणेचे आमदार कार्लोस फेरेरा आणि ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी यांच्याबरोबरचे वाद प्रसारमाध्यमांत गाजले. २०१९ नंतर भाजपप्रमाणे काँग्रेसही नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे प्रयत्न करत होती. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काँग्रेसमधील नवख्या नाना पटोले यांना २०२१मध्ये देण्यात आले.
मात्र, २०२४च्या निवडणुकीत पटोलेंवर ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’ दिसला नाही. तीच स्थिती सध्याचे हर्षवर्धन सकपाळ यांच्याबाबतीत आहे. २०२२ मध्ये गोव्यात काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत गिरीश चोडणकर यांनी अध्यक्षपद सोडले व सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर या राज्यांमध्ये काँग्रेसचे प्रभारीपद स्वीकारले. २०२५ मध्ये तामिळनाडू काँग्रेसचे प्रभारीपद स्वीकारून तामिळनाडू काँग्रेसला सत्तेत भागीदार बनविले. २०२२ नंतर चोडणकर यांच्यामध्ये ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’ ठळकपणे आढळून आला.
प्रमुखत्व म्हणजे नेतृत्व नव्हे. जसजशी राजकीय परिस्थिती बदलते, तसे राजकीय नेतृत्वाचे संदर्भ (काँटेक्स्ट) बदलतात. राजकीय नेतृत्व आणि एखाद्या शासकीय किंवा खाजगी संस्थेच्या प्रमुखत्वातील मूलभूत फरक तो हाच. राजकीय नेत्याने संघटन आणि समन्वयातून मित्रपक्षांमध्ये सहमती निर्माण करणे याला राजकीय नेतृत्व म्हणतात. काँग्रेसला सध्या युतीपेक्षा काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधील सहकाऱ्यांची जास्त गरज आहे.
निवडणुकीनंतर बऱ्याचदा युतीतले भागीदार युती सोडून जातात. २०२२ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाने सावंत यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेत नवख्या तृणमूल काँग्रेसशी युती केली. निवडणुकीनंतर मात्र भाजपने वैचारिक मित्रत्वाच्या नात्याने मगोला पुन्हा सत्तेत सामावून घेतले. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई गेली ६-७ वर्षे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र निवडणुकीला सुमारे ४ ते ५ महिने असूनदेखील गोवा फॉरवर्डच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही. काँग्रेसला सध्या ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’ निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.
भाजपचे राजकीय नेतृत्व पाहता त्यांचे अनुयायी आणि विरोधकही दृष्टीस पडतात. त्यामुळे आजच्या घडीस काँग्रेसला आपल्या अनुयायी आणि विरोधकांमध्ये द्वंद्व उभे करायची गरज आहे. तरच काँग्रेसची सार्वजनिक उपस्थिती उठून दिसेल. सावंतांची वक्तृत्व शैली हे भाजपचे भांडवल आहे. सावंतांचा ‘आवाज’ भाजपमय वातावरण निर्मितीस कारणीभूत आहे.
काँग्रेसलाही अशाच नेतृत्वाची गरज आहे. काँग्रेसचे सध्याचे राजकीय नेतृत्व पाहता काँग्रेसचा ‘आवाज’ निर्माण करणारे नेतृत्व नाही. जर सरदेसाई यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली तर काँग्रेसला ‘आवाज’ भेटू शकतो. सरदेसाई यांची वक्तृत्वशैली बहुजन तरुण वर्गाला काँग्रेसकडे आकर्षित करू शकते. त्यामुळे चोडणकरांना समन्वयकाची भूमिका घेऊन येणाऱ्या निवडणुकीत ‘पिग्मॅलिअन इफेक्ट’ दाखवावा लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.