

रुग्णांसाठी असे हवे सूत्र
रुग्ण + कुटुंब + डॉक्टर + समुदाय + सरकार अशी खास व्यवस्था उभारण्याची नितांत गरज
‘डिमेन्शिया’ म्हणजे काय?
‘डिमेन्शिया’ म्हणजे मेंदूच्या कार्यक्षमतेत हळूहळू होणारी घट. यामध्ये स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता, निर्णयक्षमता, भाषा, एकाग्रता आणि दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ‘डिमेन्शिया’ हा एक विशिष्ट आजार नसून विविध कारणांमुळे होणाऱ्या लक्षणांचा समूह आहे. वाढत्या वयात याचा धोका वाढतो, परंतु तो वृद्धत्वाचा सामान्य भाग नाही.
भारतातील वाढत्या वृद्ध लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ‘डिमेन्शिया’बाबत टाटा ट्रस्टने जाहीर केलेल्या अहवालामुळे आणखी एक आव्हान आरोग्य व्यवस्थेसमोर उभे ठाकले आहे. केवळ आजाराचे लवकर निदान करून प्रश्न सुटणार नसून, रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना आणि देखभाल करणाऱ्यांना आधार देणारी सक्षम व्यवस्था उभारण्याची गरज आहे. पुढील दशकात ‘डिमेन्शिया’ग्रस्त ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंध, जनजागृती, लवकर निदान, उपचार, पुनर्वसन आणि दीर्घकालीन देखभाल यांचा समावेश असलेले व्यापक धोरण आवश्यक ठरणार आहे. यासाठी सरकार, आरोग्य क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
उपस्थित प्रश्न
१. भारतामध्ये ‘डिमेन्शिया’चे रुग्ण आणि त्याचा धोका का वाढत आहे?
२. ‘डिमेन्शिया’ आणि सामान्य वृद्धापकाळातील विस्मरण यात नेमका फरक काय आहे?
३. रुग्णांपेक्षा त्यांच्या कुटुंबीय आणि देखभाल करणाऱ्यांवर येणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक भार किती मोठा आहे?
४. भारताची सध्याची आरोग्यव्यवस्था ‘डिमेन्शिया’च्या वाढत्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पुरेशी आहे का?
५. भारताने आत्तापासूनच काय पावले उचलणे गरजेचे आहे?
अशी आहे स्थिती
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था व युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया यांनी केलेल्या अभ्यासानुसार २०३६पर्यंत भारतातील ‘डिमेन्शिया’ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटी ६९ लाख होईल असा अंदाज.
ग्रामीण भागात, कमी शिक्षण असलेल्या आणि अधिक वयाच्या लोकांमध्ये प्रमाण अधिक आढळते.
भारतातील डिमेन्शियाचा भार राज्यागणिक आणि ग्रामीण-शहरी भागानुसार बदलतो.
भारतात ६० वर्षांवरील लोकांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण सुमारे ७.४ टक्के आहे. म्हणजे सुमारे ८८ लाख ज्येष्ठ व्यक्ती.
मुंबई, दिल्लीसारख्या शहरांसाठी योग्य असलेली व्यवस्था देशातील प्रत्येक भागासाठी तशीच उपयोगी ठरेलच असे नाही.
‘डिमेन्शिया’बद्दल गैरसमज किंवा लाज वाटत असल्यामुळे कुटुंबे समस्या लपवतात. यामुळे रुग्णाला योग्य मदत मिळत नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत व्यवस्थेचा अभाव.
भारतातील सर्वांत मोठे आव्हान लवकर निदान कसे करायचे, कुटुंबाला दीर्घकाळ कसा आधार द्यायचा आणि ग्रामीण-शहरी सर्व स्तरांवर परवडणारी व्यवस्था कशी उभी करायची?, हे आहे.
लवकर निदान
‘डिमेन्शिया’ची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य वृद्धत्व समजली जातात. उदाहरणार्थ : वारंवार त्याच गोष्टी विसरणे, परिचित व्यक्तींची नावे आठवण्यात अडचण, दैनंदिन कामे करण्यात पूर्वीपेक्षा जास्त अडचण, वर्तन किंवा व्यक्तिमत्त्वात बदल, निर्णय घेण्याची किंवा समस्या सोडवण्याची क्षमता कमी होणे. ही लक्षणे दिसली तर ‘वय झाल्यामुळे असे होते’ म्हणून दुर्लक्ष करू नये. लवकर निदान झाल्यास रुग्ण आणि कुटुंबाला पुढील नियोजन, उपचार आणि साहाय्य मिळवण्यास अधिक वेळ मिळतो.
फक्त निदान पुरेसे नाही
‘लवकर निदान’ ही पहिली पायरी आहे; पण ती पुरेशी नाही. भारतामध्ये सध्या ५० पेक्षा कमी पूर्ण क्षमतेची डिमेन्शिया केअर सेंटर्स आहेत. त्यामुळे अधिक विशेष ‘डिमेन्शिया केअर सेंटर्स’, प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, कुटुंबीय आणि सांभाळ करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन, समुदायाच्या पातळीवर मदतव्यवस्था, रुग्णालये, कुटुंबे, स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांच्यात समन्वयासाठी पुढाकार आवश्यक आहे.
‘डिमेन्शिया’ टाळता येतो का?
सध्या ‘डिमेन्शिया’वर सार्वत्रिक कायमस्वरूपी इलाज नाही, पण काही जोखमीच्या घटकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरू शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि जीवनशैलीशी संबंधित घटकांवर लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, रक्तदाब व मधुमेह नियंत्रण, सामाजिक-सांस्कृतिक सक्रियता आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणे यांना महत्त्व आहे.
ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्यांनी हळव्या मनाला साद घालावी
देशात ज्येष्ठांची लोकसंख्या वाढत असल्याने ‘डिमेन्शिया’चे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. वाढते आयुर्मान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, शारीरिक निष्क्रियता आणि हृदयविकार यांसारखे घटक ‘डिमेन्शिया’च्या जोखमीशी संबंधित आहेत. त्यामुळे याकडे केवळ वृद्धापकाळाशी संबंधित आजार म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याचे वाढते आव्हान, म्हणून पाहण्याची गरज आहे. वय वाढताना अधूनमधून एखादे नाव किंवा वस्तू कुठे ठेवली हे विसरणे सामान्य असू शकते; मात्र ‘डिमेन्शिया’मध्ये विस्मरण वाढत जाते आणि त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. व्यक्तीला परिचित कामे करण्यात अडचण येणे, निर्णयक्षमता कमी होणे, संभाषणात अडथळे येणे किंवा परिचित व्यक्ती व ठिकाणे ओळखण्यात अडचण येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. ‘डिमेन्शिया’चा परिणाम केवळ रुग्णावर होत नाही.
दीर्घकाळ रुग्णाची काळजी घेताना कुटुंबीयांवर मानसिक ताण, झोपेचा अभाव, शारीरिक थकवा वाढू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याच्याही उपचार व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असायला हवा. ‘डिमेन्शिया’बाबत जागरूकता, लवकर निदान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि दीर्घकालीन देखभालीच्या सुविधांमध्ये अजूनही मोठी गरज आहे. आपले सगळे गणित मेंदूच्या संज्ञानात्मक क्षमतेशी बांधलेले असते. डिमेन्शिया मुळे तेच ढासळते. वेळ काळाचे भान, भावनांवरील नियंत्रण डळमळीत होते. मेंदूचे गणित जरी बिघडले तरी मनात मायेचा ओलावा असतो, म्हणूनच या आजाराशी झुंजणाऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्यांनी त्या हळव्या मनालाच साद घालून सुरवात करावी.
- सुलक्षा मनेष गावस, बाल मानसशास्त्रज्ञ तथा समुपदेशक
‘आजी केअर सेंटर’
कदंब पठार येथे स्थित ‘आजी केअर सेंटर’ हे केंद्र, स्मृतिभ्रंश असलेल्यांसाठी विशेष काळजी, सहाय्यक जीवनशैली आणि व्यावसायिक घरगुती काळजी सहाय्य पुरवते. (https://aajicare.in/goa/)
टेली-मानस : स्मृतिभ्रंशासंबंधी मार्गदर्शनासाठीकेंद्रीय मंत्रालयाची मोफत, २४/७ मानसिक आरोग्य टेली-समुपदेशन हेल्पलाइन १४४१६ किंवा १-८००-९१-४४१६ या क्रमांकावर उपलब्ध आहे.
‘द डिमेन्शिया सोसायटी ऑफ गोवा’ : आल्त पर्वरी येथे स्थित, ही संस्था स्थानिक काळजीवाहक आणि रुग्णांच्या मानसिक आणि आधारविषयक गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
तपासणी आणि वैद्यकीय सेवा स्मृतिभ्रंश तपासणी कार्यक्रम : डॉ. अमित डायस यांच्यासारख्या स्थानिक सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या सहकार्याने सुरू केलेले, समुदाय तपासणी कार्यक्रम संपूर्ण गोव्यात चालवले जातात, जेणेकरून ६० वर्षांवरील प्रौढांमधील स्मरणशक्तीच्या समस्या लवकर ओळखता येतील.
विशेषज्ञ : उत्तर आणि दक्षिण गोव्यातील स्थानिक मानसोपचारतज्ज्ञ आणि मज्जातंतू तज्ज्ञ वैद्यकीय व्यवस्थापन आणि वर्तणूक समुपदेशन देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.