
Team India Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचे सामने नेहमीच जबरदस्त उत्साह आणि रोमांचने भरलेले असतात. आता पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींचे लक्ष 19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे (ODI) मालिकेवर लागले आहे. या मालिकेची सर्वात खास गोष्ट म्हणजे, टीम इंडियाची कमान युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याच्या हाती असेल, तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करेल. ही मालिका केवळ दोन्ही संघांसाठीच नाही, तर शुभमन गिलसाठी कर्णधार म्हणून पहिली मोठी कसोटी असेल.
आजवर या दोन्ही देशांदरम्यान एकूण 152 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले आहेत, तर भारताने 58 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 1980 पासून सुरु असलेल्या या क्रिकेट इतिहासात अनेक अविस्मरणीय क्षण चाहत्यांच्या मनात आजही घर करुन आहेत.
ऑस्ट्रेलियाची भूमी टीम इंडियासाठी (Team India) नेहमीच एक कठीण आव्हान राहिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियात आजपर्यंत एकूण 54 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताला फक्त 14 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर 38 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियातील भारताच्या विजयाची टक्केवारी केवळ 26 टक्के इतकीच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताने ऑस्ट्रेलियामध्ये अनेक महत्त्वाचे सामने जिंकून आपली कामगिरी सुधारली आहे.
सर्वाधिक धावसंख्या: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने केलेली सर्वाधिक धावसंख्या 29 नोव्हेंबर 2020 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 338/9 इतकी आहे.
सर्वात मोठा विजय: 1991 मध्ये पर्थ येथे भारताने ऑस्ट्रेलियाला 107 धावांनी हरवून आपला सर्वात मोठा विजय नोंदवला होता.
याव्यतिरिक्त, मेलबर्न येथे भारताने दोन वेळा कांगारु संघाला 8 विकेट्सने मात दिली.
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय फलंदाजांच्या कामगिरीचा विचार केल्यास, रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव सर्वात टॉपवर येते. त्याने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 990 धावा केल्या आहेत, जो कोणत्याही भारतीय फलंदाजासाठी सर्वाधिक विक्रम आहे. त्याचा 58.23 चा सरासरी आणि चार शतके तसेच 29 षटकार हे सिद्ध करतात की रोहित ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर किती धोकादायक फलंदाज आहे. विशेषतः 2016 मध्ये पर्थ येथे त्याने केलेली नाबाद 171 धावांची खेळी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
त्याचवेळी, या आगामी मालिकेत टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. एका बाजूला शुभमन गिलला स्वतःला एक सक्षम कर्णधार म्हणून सिद्ध करण्याची संधी मिळेल, तर दुसरीकडे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांवर चमकदार कामगिरी करण्याची मोठी जबाबदारी असेल. ऑस्ट्रेलियात त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर वेगवान खेळपट्ट्यांवर यजमान संघाला हरवणे सोपे नसेल. परंतु, जर टीम इंडियाने सांघिक प्रयत्न केले, तर ही मालिका निश्चितच अविस्मरणीय ठरु शकते आणि गिलच्या कर्णधारपदाची यशस्वी सुरुवात होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.