
Asia Cup 2025 India vs Pakistan final
आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येणार आहेत. हा ऐतिहासिक सामना आज, रविवार २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले असून, त्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर दडपणासोबतच अपेक्षाही अधिक आहेत.
अंतिम सामन्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी संघाच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: क्षेत्ररक्षणातील चुका हा भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचे गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान गावस्कर म्हणाले, "भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सातत्याने सुधारत आहे, मात्र क्षेत्ररक्षण अपेक्षेप्रमाणे नाही. खेळाडू झेल सोडत आहेत, चुकीचे थ्रो करत आहेत. जर अंतिम सामन्यातही असेच झाले, तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो." गावस्कर यांनी संघाला क्षेत्ररक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
२०२५ च्या आशिया कपमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण अनेकवेळा कमजोर ठरले आहे.
२१ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने दोन झेल सोडले, तर कुलदीप यादवकडूनही एक झेल सुटला.
बांगलादेशविरुद्ध मिसफिल्डिंगचे प्रकार झाले.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तर शेवटच्या क्षणी अक्षर पटेलकडून मिड-ऑनवर मिसफिल्डिंग झाली, त्यानंतर हर्षित राणाही चेंडू नीट पकडू शकला नाही.
या चुकांमुळे प्रतिस्पर्ध्यांना संधी मिळाली असून, अंतिम सामन्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास भारताच्या विजयाच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो.
भारताने सुपर फोरमध्ये पाकिस्तानला पराभूत करून आपले वर्चस्व दाखवले होते. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पाकिस्तानने भारताकडून पराभव पत्करल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. त्यांनी सलग श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली आहे.
सामना ठरणार रंगतदार
भारत-पाकिस्तानची पारंपरिक प्रतिस्पर्धी भावना, दबावाची परिस्थिती आणि अंतिम सामन्याचे व्यासपीठ – यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. भारताने जरी दोन्ही पूर्वीच्या लढती जिंकल्या असल्या, तरी पाकिस्तानचा पुनरागमनाचा आत्मविश्वास त्यांना धोकादायक प्रतिस्पर्धी बनवतो. आज रात्री दुबईत कोण इतिहास रचतो, हे पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.