Rajpal Yadav Interim Bail: बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या एका जुन्या कर्जाच्या प्रकरणात अडकला असून 5 फेब्रुवारी रोजी त्याला कोर्टाच्या आदेशानुसार तिहार जेलमध्ये शरण जावे लागले होते. मात्र आता 12 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर पुतणीच्या लग्नाचे कारण देऊन त्याने अंतरिम जामीन मिळवला.
दीड कोटी रुपये जमा केल्यानंतर त्याची सुटका झाली असली तरी त्याला कर्ज देणारे व्यापारी माधव गोपाल अग्रवाल यांनी आता आपले दुःख व्यक्त केले आहे. 16 वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाचा खुलासा करताना अग्रवाल यांनी सांगितले की, पैशांसाठी त्यांना एका अभिनेत्याच्या समोर अक्षरशः रडावे लागले आणि भीक मागावी लागली, तरीही त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, या वादाची सुरुवात 2012 मध्ये झाली, जेव्हा राजपाल यादवने (Rajpal Yadav) आपली फिल्म 'अता पता लापता' पूर्ण करण्यासाठी अग्रवाल यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. राजपालने त्यांना सांगितले होते की, फिल्मचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, पण तात्काळ पैसे मिळाले नाही तर चित्रपट बुडेल.
अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांनी हे पैसे चित्रपटामध्ये गुंतवणूक म्हणून दिले नव्हते, तर ते कडक अटींवर दिलेले कर्ज होते. त्यांच्यामध्ये झालेल्या करारात असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, या कर्जाचा परतावा चित्रपटाची कमाई किंवा प्रदर्शनावर अवलंबून नसेल, तर तो एका निश्चित वेळेतच करावा लागेल. या व्यवहारासाठी राजपाल यादवने वैयक्तिक हमी देखील दिली होती.
अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, मात्र राजपालने पैसे परत न केल्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली. त्यांनी राजपालच्या घरी जाऊन एखाद्या लहान मुलासारखे रडून आपली कैफियत मांडली होती. त्यांनी दुसऱ्यांकडून पैसे उधार घेऊन राजपालला मदत केली होती, त्यामुळे त्यांनी राजपालकडे केवळ पैसे परत करण्याची तारीख किंवा नवा करार करण्याची विनंती केली होती. इतकेच नाही तर, जेव्हा अग्रवाल यांनी अधिक पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा राजपालची पत्नी राधा हिने त्यांना भावनिक मेसेज पाठवून मदतीची विनंती केली होती, ज्यामुळे ते पुन्हा पैसे देण्यास तयार झाले.
मात्र हा वाद तेव्हा अधिक वाढला जेव्हा राजपालने करारातील अटी मोडल्या. चित्रपटाचे संगीत अमिताभ बच्चन यांनी लाँच केले तेव्हा कराराप्रमाणे कमाईचे अधिकार सोपवण्यास राजपालने टाळाटाळ केली. त्यामुळे अग्रवाल यांनी कोर्टात धाव घेतली. चित्रपट प्रदर्शित झाला पण तो फ्लॉप ठरला, ज्यामुळे राजपालचे पैसे देण्याचे आश्वासन हवेत विरले. 2013 मध्ये 10.40 कोटी रुपयांच्या सेटलमेंटवर शिक्कामोर्तब झाले, पण राजपालने दिलेले अनेक चेक बाऊन्स झाले.
अग्रवाल सांगतात, ते एक व्यापारी असून त्यांना कोणाचीही बदनामी करण्यात रस नाही, त्यांना फक्त त्यांचे कष्टाने कमावलेले पैसे परत हवे आहेत. वारंवार होणाऱ्या फसवणुकीमुळेच त्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.