रोहा: गेल्या काही दिवसांपासून दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद झाल्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. मात्र, प्रवाशांची ही नाराजी दूर करण्यासाठी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रवासाचा मार्ग सुखकर झाला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्र. ०११२९ (मुंबई ते मडगाव) ही विशेष ट्रेन शुक्रवार, ३ एप्रिल आणि रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईहून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०११३० (मडगाव ते मुंबई) ही ट्रेन शुक्रवार, ३ एप्रिल आणि रविवार, ५ एप्रिल रोजी मडगाववरून दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल. या विशेष फेऱ्यांमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या विशेष ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २३ महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर थांबे दिल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना आपल्या घराजवळच्या स्थानकावर उतरणे सोपे होणार आहे.
या विशेष ट्रेनसाठी (गाडी क्र. ०११३०) आरक्षण आज, २४ मार्च २०२६ पासून सर्व अधिकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. या गाडीला एकूण २२ डबे जोडण्यात आले असून, त्यामध्ये २ टायर एसी, ३ टायर एसी, स्लीपर क्लास आणि जनरल डब्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी आपले आरक्षण लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.
रेल्वेने विशेष ट्रेन जाहीर केली असली तरी, गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली हक्काची 'दादर-रत्नागिरी पॅसेंजर' बंद केल्यामुळे प्रवाशांच्या मनात अजूनही सल कायम आहे. या पॅसेंजरच्या जागी उत्तर भारतीय राज्यांसाठी गाड्या सुरू केल्याचा आरोप कोकणवासीय करत आहेत. विशेष गाड्या केवळ तात्पुरता दिलासा देत असल्या तरी, आमची हक्काची पॅसेंजर गाडी पुन्हा कायमस्वरूपी सुरू व्हावी, ही मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी लावून धरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.