कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या करुळ घाटात कोसळलेली दरड अखेर हटविण्यात आली आहे. सोमवारी (१६ जून) सकाळी साडे दहाच्या सुमारास कोसळलेली ही दरड चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर हटविण्यात आली. दुपारी अडीच नंतर या घाटातूक वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.
करुळ घाटात सकाळी साडे दहा वाजता दिंडवणेजवळ मार्गालगतची दरड कोसळली. माती आणि मुरुमाचा मोठी ढीगारा रस्त्यावर आला व तो सुमारे १०० मीटर भागात पसरला. यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ हालचाली सुरु करण्यात आल्या व जेसीबीच्या मदतीने दुपारी २.३० वाजता मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा करुळ घाट महत्वाचा मानला जातो. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे यासह रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. या पावसाचा फटका करुळ घाटाला देखील बसला व पावसामुळे सैल झालेली माती रस्त्यावर आली. यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपण ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मुंबई - गोवा महामार्गाला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला असून वाकेड घाटात दरड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरु होती. प्रशासनाने दरड हटविण्यास सुरुवात केली आहे. यासह रत्नागिरी, रायगड भागात देखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. कोकणासह राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.