अहमदाबाद: विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांचे अपयश आणि अहमदाबादमधील स्टेडियम यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असते, पण स्थानिक खेळाडू अक्षर पटेलने मै हूं ना..! असा हसत हसत दिलासा दिला.
२०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि देशभरात सर्वांचा हिरमोड झाला होता. या टी-२० स्पर्धेत काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारताची हार झाली. आता रविवारी अंतिम सामना होणार असल्याने भारतीय संघाचे काय होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.
मुंबईतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात दोन अफलातून झेल पकडणारा उपकर्णधार अक्षर पटेल मात्र अंतिम सामन्याबाबतही आशावादी आहे. अक्षर हा गुजरातचा खेळाडू. अहमदाबादमधील स्टेडियम हे त्याचे होम ग्राउंड, पण तो दोन वर्षांनंतर येथे खेळणार आहे.
कोणत्याही प्रकारच्या विश्वकरंडक सामन्यात तो येथे खेळलेला नाही. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला वगळण्यात आले होते, त्यावरून टीकाही झाली होती.
विश्वकरंडक स्पर्धेतील सामना घरच्या मैदानावर खेळण्याची गौरव आणि सन्मान काही वेगळाच असतो. माझा खेळ पाहण्यासाठी माझा मुलगा, कुटुंब येईल. त्यांच्यासमोर मी प्रथमच खेळेने आणि वर्ल्डकपमधील सामने व अहमदाबादमधील स्टेडियममधील अपयश याची चिंता नसावी, असे अक्षर म्हणाला.
उपांत्य सामन्यात अक्षरने इंग्लंड कर्णधार हॅरी ब्रुकचा पाठीमागे धावत जात अफलातून झेल पकडला, तर धोकादायक ठरू लागलेल्या विल जॅक्सचा झेल दुबेने पकडला असला तरी अक्षरने सीमारेषेवर चेंडू पकडला आणि धावण्याच्या ओघात बाहेर जाण्याअगोदर तेथे उभा असलेल्या दुबेकडे चेंडू फेकला.
त्यामुळे झेल दुबेच्या नावावर लागला. या दोन झेलांबाबत विचारले असता अक्षर म्हणाला, ब्रुकचा झेल फारच कठीण होता. माझ्यासाठी तो सर्वोत्तम होता. हा दिवस काय होता कळला नाही. चेंडू माझ्या मागेच लागला होता, असे अक्षर हसत हसत म्हणाला.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला इंग्लंडने फलंदाज गमावूनही लढा कायम ठेवला. तोडीस तोड फलंदाजी केली जात होती. सामना हातून निसटत चालला होता का, याबाबत विचारले असता अक्षर म्हणाला, बुमरा आणि अर्शदीप यांची षटके शिल्लक होती. त्यामुळे चिंता नव्हती, परंतु इंग्लंडचा प्रत्येक फलंदाज आक्रमक फलंदाजी करणार, हे उघड होते. त्यामुळे दडपण घ्यायचे नाही, हे आम्ही ठरवले होते.
या स्पर्धेत हुकमी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती पूर्ण अपयशी ठरत आहे, याबाबत विचारले असताना अक्षरने सांगितले. टी-२० प्रकारात तो क्रमवारीत पहिल्या स्थानापर्यंत पोहोचलेला गोलंदाज आहे. त्याने आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आता फरक आत्मविश्वासाचा आहे. एक-दोन विकेट सुरुवातीला मिळाल्या की त्याची मानसिकता लगेचच बदलेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.