

नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील दोन शक्तिशाली देशांमधील संघर्ष आता जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. जर हे युद्ध प्रदीर्घ काळ चालले, तर भारताच्या तेल पुरवठ्यावर त्याचे गंभीर परिणाम होतील. भारत आपल्या गरजेच्या निम्म्याहून अधिक तेल याच क्षेत्रातून आयात करतो. या युद्धामुळे केवळ इंधनच नाही, तर शेअर बाजार आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतासाठी कच्चे तेल महाग होण्याचे मुख्य कारण 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग ठरू शकतो. हा मार्ग पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडतो. जगातील एकूण पेट्रोलियम उत्पादनांपैकी सुमारे २० टक्के व्यापार याच मार्गावरून होतो. भारत आपले कच्चे तेल सौदी अरेबिया, इराक आणि संयुक्त अरब अमीरात यांसारख्या देशांकडून याच मार्गाने मागवतो. जर युद्धामुळे हा मार्ग बंद झाला किंवा विस्कळीत झाला, तर पुरवठा साखळी तुटून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल.
सध्याच्या अहवालांनुसार, युद्धाच्या भीतीमुळे 'ब्रेंट क्रूड'च्या किमती प्रति बॅरल ७० ते ८० डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डीझेलच्या दरांवर होतो. इंधन महागले की वाहतुकीचा खर्च वाढतो, ज्यामुळे भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आपोआप वाढतात. यामुळे सामान्य माणसाच्या घरगुती बजेटवर मोठा ताण येणार आहे.
केवळ तेलच नाही, तर भारताची इतर देशांना होणारी निर्यातही संकटात येऊ शकते. भारताच्या एकूण गैर-तेल निर्यातीपैकी १० टक्क्यांहून अधिक हिस्सा आखाती देशांशी संबंधित आहे. यामध्ये बासमती तांदूळ, चहा, मसाले, फळे, भाज्या आणि अभियांत्रिकी उत्पादनांचा समावेश होतो. युद्धामुळे सागरी मार्ग धोकादायक बनल्यास शिपिंग चार्जेस वाढतील, परिणामी या वस्तू जागतिक बाजारात महाग होतील. तसेच, अनेक विमान कंपन्यांनी आपले मार्ग बदलल्याने किंवा उड्डाणे रद्द केल्याने विमान प्रवासही महागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.