T20 World Cup 2026: इंग्लंडने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमांचक विजयाने टी20 विश्वचषक 2026 च्या समीकरणामध्ये अशी काही खळबळ उडवून दिली की, ज्याची कल्पना कदाचित क्रिकेट विश्वाने कधीच केली नव्हती. पल्लेकेलेच्या मैदानावरील त्या पराभवानंतर आता अशी परिस्थिती निर्माण झाली की, पुरुषांच्या 51 वर्षांच्या जागतिक क्रिकेट इतिहासात (वनडे आणि टी20 विश्वचषक) पहिल्यांदाच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे तिन्ही आशियाई संघ एकाच वेळी बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जर असे घडले, तर हा एक नकोसा नवा इतिहास ठरेल, तोही अशा वेळी जेव्हा या भव्य स्पर्धेचे यजमानपद भारतीय उपखंडाकडे आहे. गेल्या पाच दशकांचा विचार केला तर, 1975 च्या पहिल्या विश्वचषकापासून आतापर्यंत एकूण 23 जागतिक स्पर्धा पार पडल्या आहेत. या प्रत्येक स्पर्धेत भारत (India), पाकिस्तान किंवा श्रीलंका यांपैकी किमान एका संघाने तरी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली होती.
या तिन्ही दिग्गज संघांनी मिळून आतापर्यंत आठ विश्वविजेतेपदे भूषवली आहेत. यात भारताने 4 (2 वनडे आणि 2 टी20), पाकिस्तानने 2 आणि श्रीलंकेने 2 अशी जेतेपदे पटकावली आहेत. भारत, पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका या तिन्ही संघांनी प्रत्येकी 13-13 वेळा जागतिक स्पर्धांच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र यावेळचे सुपर-8 मधील समीकरण पूर्णपणे आशियाई संघांच्या विरोधात जाताना दिसत आहे.
ग्रुप-1 मध्ये टीम इंडियाची वाटचाल अत्यंत खडतर झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या मोठ्या पराभवामुळे भारताच्या नेट रन रेटला मोठा फटका बसला आहे. त्यातच वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी धुव्वा उडवल्यामुळे भारतापुढील पेच अधिक वाढला आहे.
आता भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चेन्नईमध्ये 26 फेब्रुवारीला होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात आणि 1 मार्चला कोलकाता येथे होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर ते विजय मोठ्या फरकाने मिळवावे लागतील. तसेच, दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करावे, अशी प्रार्थनाही भारतीय चाहत्यांना करावी लागणार आहे. जर यातील एकही निकाल भारताच्या बाजूने लागला नाही, तर टीम इंडियाचे आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात येईल.
दुसरीकडे, ग्रुप-2 मध्ये आशियाई संघांवर बाहेर पडण्याचे सावट अधिक गडद आहे. इंग्लंडने सलग दोन विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच पक्के केले, तर न्यूझीलंडचा संघही सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. जर येणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला, तर श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतपणे संपेल. अशी स्थिती उद्भवल्यास 51 वर्षांच्या जागतिक क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 'सेमीफायनल लाईनअप'मध्ये एकही आशियाई संघ नसेल.
यापूर्वी, केवळ 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी वेळ आली होती जेव्हा हे तिन्ही संघ बाद फेरीत पोहोचू शकले नव्हते, परंतु विश्वचषक स्पर्धेत (ODI किंवा T20) असा प्रसंग कधीच ओढवला नाही. आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष सुपर-8 मधील उर्वरित सामन्यांकडे लागले आहे. भारतीय उपखंडातील हे तिन्ही संघ शेवटच्या क्षणी चमत्कार करुन आपला 51 वर्षांचा गौरवशाली इतिहास वाचवणार की 2026 चा हा विश्वचषक आशियाई क्रिकेटसाठी एक काळा अध्याय ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.