1983 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 1983: भारत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची कहाणी, 'हा' खेळाडू ठरलेला मॅन ऑफ द मॅच

भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वविजय मिळण्याची कहाणी

Pranali Kodre

40 years of India’s 1983 World Cup win: भारतीय क्रिकेट इतिहासात 25 जून हा दिवस खूपच खास आहे. कारण याच दिवशी 40 वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 1983 वर्ल्डकपवर नाव कोरले होते. हा वर्ल्डकप विजय क्रिकेटपटूंच्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरित करणार ठरला.

भारतीय संघ या स्पर्धेत जेव्हा उतरला होता, तेव्हा त्यांना विजेतेपदासाठी प्रबळ दावेदारही मानले जात नव्हते. अगदी भारतीय संघातील काही खेळाडूंनाही आपण जिंकू शकतो असा विश्वास नव्हता. त्याचमुळे त्यांनी या वर्ल्डकपनंतर अमेरिकेला फिरायच्या योजनाही आखल्या होत्या. एक मजेशीर कहाणी म्हणजे के श्रीकांत यांनी तर त्यांच्या हनिमूनची तिकीटेही काढली होती, जी त्यांना भारतीय संघ अंतिम सामन्यात गेल्याने रद्द करावी लागली होती.

भारतीय संघाने संपूर्ण 1983 वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी केली. कपिल देव यांच्या झिम्बाब्वे विरुद्ध केलेल्या 175 धावांच्या खेळीने भारतीय संघात मोठा आत्मविश्वास भरला होता. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नव्हते.

उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडला 6 विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर अंतिम सामन्यात भारताची गाठ होती, ती पहिल्या दोन्ही वर्ल्डकप जिंकलेल्या बलाढ्य वेस्ट इंडिजशी. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना फार मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.

भारताने 54.4 षटकात सर्वबाद 183 धावा केल्या होत्या. भारताकडून के श्रीकांत यांनी सर्वाधिक 38 धावांची खेळी केली होती. तसेच मोहिंदर अमरनाथ यांनी 26 आणि संदीप पाटील यांनी 27 धावांच्या छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून अँडी रॉबर्ट्सने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने पहिली विकेट 5 धावांवरच गमावली होती. पण नंतर देसमंड हाईन्स आणि विव रिचर्ड्स यांनी डाव सावरला होता. मात्र त्यानंतर मदन लाल यांच्या स्पेलने कमाल केली. त्यांनी पहिल्यांदा हाईन्सला 13 धावांवर बाद केले. त्यानंतर विव रिचर्ड्स यांची 33 धावांवर विकेट घेतली.

रिचर्ड्स यांचा झेल कपिल देव यांनी मागे पळत जात पकडल होता. हा झेल आजही सर्वोत्तम झेलमध्ये गणला जातो. ही विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली. त्यानंतर मात्र, वेस्ट इंडिजने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या आणि संपूर्ण संघ 52 षटकात 140 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघ 43 धावांनी विजयी झाला आणि भारताने पहिल्यांदा वर्ल्डकपवर नावही कोरले.

भारताकडून गोलंदाजीत मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तसेच बलविंदर संधू यांनी 2 विकेट्स घेतल्या. कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

सामनावीर पुरस्कार

अंतिम सामन्यात केलेल्या अष्टपैलू कामगिरीबद्दल मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामन्यात देखील अमरनाथ यांनीच सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

एडिटरने खाल्लेले शब्द

दरम्यान, 1983 वर्ल्डकपवेळी विस्डेन क्रिकेट मासिकाचे एडिटर डेव्हिड फ्रिथ यांनी एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी भारत साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकत नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी म्हटले होते की जर भारतीय संघ पुढे गेला, तर ते त्यांचे शब्द खातील (eat his words).

अखेर जेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला, तेव्हा फ्रिथ यांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्यांनी त्यांचा लेख खरोखर कॅमेरासमोर खाल्ला होता. त्यांनी त्यांचा लेख खातानाचा फोटोही मासिकात छापण्यात आला होता.

कपिल देव यांना होता विश्वास

दरम्यान, जरी अनेकांना भारतीय संघ विजय मिळवू शकेल, असा विश्वास नसला, तरी कपिल देव यांना हा विश्वास होता. त्या वर्ल्डकप विजयाचा भाग असलेले किर्ती आझाद यांनी सांगितल्याप्रमाणे कपिल देव यांना सुरुवातीपासून संघावर विश्वास होता.

त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये एक शॅम्पेनची बॉटल ठेवली होती, जी त्यांनी कोणालाही अखेरच्या सामन्यापर्यंत घेऊ दिली नव्हती. पण जेव्हा अंतिम सामना झाला, तेव्हा तीच शॅम्पेनची बॉटल पहिल्यांदा लॉर्ड्च्या बाल्कनीमध्ये उघडण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT