चेन्नई: आयपीएल २०२६ च्या रोमांचक लढतीत सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर ५ गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. हैदराबादच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने धडाकेबाज कामगिरी केली. मात्र, सामना संपल्यानंतर ईशान किशनने मैदानात केलेल्या एका इशाऱ्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चेन्नईच्या चाहत्यांना (CSK Fans) ट्रोल केल्याचा आरोप ईशानवर केला जात असून, या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ७ बाद १८० धावांचा आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादकडून ईशान किशनने वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४७ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७० धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने एक षटक राखून १८१ धावा करत सामना खिशात टाकला.
सामना जिंकल्यानंतर ईशान किशनने चेपॉक स्टेडियमवर उपस्थित असलेल्या चेन्नईच्या प्रेक्षकांच्या दिशेने पाहत आधी तोंडाने शिट्टी वाजवली (ज्याला सीएसकेचे चाहते 'व्हिसल पोडू' म्हणतात). त्यानंतर त्याने दोन्ही हातांनी घराचा आकार तयार केला आणि चाहत्यांना हाताने 'आता इथून घरी निघून जा' असा इशारा केला.
विजयाच्या जल्लोषाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. चेन्नईच्या चाहत्यांनी ईशानच्या या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी हा निव्वळ मैदानी स्लेजिंगचा भाग असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे.
या पराभवामुळे पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या १३ सामन्यांत केवळ १२ गुण असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरले आहेत. चेन्नईला लीग स्टेजमध्ये आता फक्त एकच सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकला तरी चेन्नई जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकते. दिल्ली कॅपिटल्सची स्थितीही हुबेहूब अशीच असून तेही १४ गुणांच्या पुढे जाऊ शकत नाहीत.
चेन्नई आणि दिल्लीच्या तुलनेत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता जास्त आहेत. राजस्थानचे अजून दोन सामने शिल्लक असून त्यांच्या खात्यात १२ गुण आहेत. त्यांनी दोन्ही सामने जिंकल्यास ते थेट १६ गुणांसह पात्र ठरतील, मात्र एक सामना हरल्यास ते १४ गुणांवर अडकतील.
दुसरीकडे, पंजाब किंग्जचे १३ सामन्यांत १३ गुण आहेत. पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी राजस्थानने त्यांचा किमान एक सामना हरावा अशी प्रार्थना करावी लागेल, तसेच स्वतःचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. त्यामुळे या वेळचे प्लेऑफचे समीकरण कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.