Team India 5 Record: मुल्लांपूर येथे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला. भारताने हा सामना एक डाव आणि 300 धावांनी जिंकून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या दृष्टीने आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा विजय 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला होता.
विशेष म्हणजे, भारताच्या कसोटी इतिहासातील पहिल्या तीन मोठ्या विजयांपैकी दोन विजय आता एकट्या अफगाणिस्तानविरुद्ध नोंदवले गेले. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात 564 धावांवर 8 गडी बाद अशी आपली खेळी घोषित केली होती. या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात अवघ्या 152 धावांवर गारद झाला.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा फिरकीपटू मानव सुथारने अत्यंत घातक गोलंदाजी करत पहिल्या डावात अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात 6 बळी टिपले. त्यानंतर फॉलोऑन खेळण्यासाठी मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसला आणि अवघ्या 112 धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने 36 धावा देत 4 गडी बाद केले. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर केलेल्या अद्भूत कामगिरीच्या जोरावर या सामन्यात 5 मोठे जागतिक विक्रम मोडीत काढले.
सलामीला आलेल्या के. एल. राहुलने शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक झळकावले. त्याने 11 चौकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी खेळली. अफगाणिस्तानविरुद्धचे त्याचे हे पहिलेच कसोटी शतक ठरले. या खेळीदरम्यान राहुलने पहिल्यांदा श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या 9000 धावांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला. त्याने 121 सामन्यांच्या 210 डावांमध्ये हा पराक्रम केला.
दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानेही आपल्या बॅटची जादू दाखवत 177 चेंडूत 126 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. यात 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक होते. या शतकासह गिल अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा भारतीय फलंदाज ठरला असून त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला. तसेच, कर्णधार म्हणून गिलने कसोटीत 1000 धावाही पूर्ण केल्या. तो अवघ्या 15 डावांमध्ये हा टप्पा गाठणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा सर्वात वेगवान भारतीय कर्णधार ठरला. 1000 कसोटी धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये गिलची फलंदाजीची सरासरी 82.76 पेक्षा जास्त असून ती सर्वोत्तम आहे.
पदार्पणाच्या सामन्यातच इतिहास रचणाऱ्या 23 वर्षीय मानव सुथारने पहिल्या डावात 6 बळी घेऊन कसोटी पदार्पणात 5 किंवा त्याहून अधिक गडी बाद करणारा भारताचा 10 वा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. पदार्पणाच्या कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो आता थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या यादीत पहिल्या स्थानावर नरेंद्र हिरवानी (16 बळी, 1988) कायम आहेत. अशा प्रकारे टीम इंडियाने (Team India) मुल्लांपूर कसोटीत आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट जगतात नवा इतिहास रचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.