Shreyanka Patil Catch Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटला की खेळाचा थरार नेहमीच शिगेला पोहोचलेला असतो. या सामन्यांमध्ये अनेकदा असे काही क्षण पाहायला मिळतात, जे चाहत्यांच्या मनात दीर्घकाळ घर करुन राहतात. आयसीसी महिला ट्वेंटी-20 विश्वचषक 2026 मध्ये एजबेस्टनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही असाच एक थक्क करणारा नजरा पाहायला मिळाला.
भारताची (India) युवा खेळाडू श्रेयंका पाटीलने हवेत झेप घेत पकडलेला एक अद्भूत झेल सध्या क्रीडा जगतात चर्चेचा विषय बनला. तिच्या या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे संपूर्ण स्टेडियम थक्क झाले आणि भारताच्या विजयासोबतच श्रेयंकाच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) देखील आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन या शानदार झेलचा व्हिडिओ शेअर केला.
हा थरारक क्षण पाकिस्तानच्या डावातील 15व्या षटकात घडला. भारताची फिरकीपटू श्री चरणी गोलंदाजी करत होती. तिने षटकातील चौथ्या चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर थोडी फ्लाईट दिली, ज्यावर पाकिस्तानची फलंदाज रमीन शमीम पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र, चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हवेत उडाला. तिथे उभ्या असलेल्या श्रेयंका पाटीलने विजेच्या वेगाने हालचाल केली.
चेंडूवरुन तिने आपली नजर अजिबात हटवली नाही आणि हवेत पूर्ण डायव्ह मारत जमिनीला समांतर होत एक उत्कृष्ट लो कॅच पकडला. हा झेल इतका कठीण होता की, काही सेकंदांसाठी पाकिस्तानी फलंदाज आणि मैदानातील कोणालाही विश्वास बसत नव्हता की चेंडू जमिनीला टेकण्यापूर्वीच पकडला गेला. श्रेयंकाच्या या अद्भूत झेलमुळे पाकिस्तानची धावसंख्या 91 धावांवर 7 बाद अशी झाली आणि सामना पूर्णपणे भारताच्या खिशात गेला.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 170 धावांचा मजबूत डोंगर उभा केला होता. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर स्टार फलंदाज स्मृती मंधानाने उत्कृष्ट फलंदाजी करत 44 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर (36 धावा) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तर अखेरच्या षटकांमध्ये रिचा घोषने अवघ्या 17 चेंडूंत 34 धावांची वादळी खेळी खेळत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी पॉवरप्लेपर्यंत 1 बाद 52 धावा केल्या होत्या. मुनीबा अलीने 41 धावांची खेळी खेळत भारताची चिंता वाढवली होती, परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पूर्णपणे पलटवले. भारताची स्टार अष्टपैलू दीप्ति शर्माने घातक गोलंदाजी करत 4 षटकांत अवघ्या 10 धावा देऊन 5 बळी पटकावले आणि पाकिस्तानच्या (Pakistan) फलंदाजीचे कंबरडे तोडले. तिला श्री चरणीने 3 विकेट्स घेत उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांच्या या अचूक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 17 षटकांत अवघ्या 106 धावांवर गारद झाला आणि भारताने 64 धावांनी एक ऐतिहासिक आणि शानदार विजय साजरा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.