आयपीएल २०२६ (IPL 2026) चा १९ वा हंगाम आता आपल्या अंतिम आणि सर्वात रोमांचक टप्प्यात आला आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने आधीच फायनलचे तिकीट पक्के केले असून, आता दुसऱ्या फायनलच्या तिकिटासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. २९ मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लांपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात 'क्वालिफायर-२' चा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये RCB विरुद्ध भिडणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एकच धाकधूक आहे की, जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर फायनलमध्ये कोण जाणार?
३१ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी २९ मे रोजी खेळवल्या जाणाऱ्या या नॉकआऊट सामन्यासाठी आयपीएलने कोणताही 'रिझर्व्ह डे' (राखीव दिवस) ठेवलेला नाही. सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान ५-५ ओव्हर्स खेळणे अत्यंत आवश्यक आहे. जर पावसामुळे ५ ओव्हर्सचा खेळही शक्य झाला नाही, तर हा सामना अधिकृतपणे रद्द घोषित केला जाईल. आयपीएलच्या नियमांनुसार, प्लेऑफ किंवा बाद फेरीचा सामना रद्द झाल्यास, लीग स्टेजच्या पॉइंट्स टेबलमध्ये (गुणतालिका) जो संघ वरच्या स्थानावर होता, त्याला थेट विजेता घोषित केले जाते.
चालू हंगामाच्या पॉइंट्स टेबलचा विचार केला, तर शुभमन गिलचा गुजरात टायटन्स संघ लीग स्टेज संपली तेव्हा दुसऱ्या स्थानावर (Rank 2) होता. दुसरीकडे, संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर (Rank 4) होता. त्यामुळे जर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर पॉइंट्स टेबलमधील सरस कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सला थेट फायनलचे तिकीट मिळेल आणि राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपुष्टात येईल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २८ आणि २९ मे च्या सकाळपर्यंत चंदीगड आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे शुक्रवार संध्याकाळपर्यंत हवामान पूर्णपणे स्वच्छ होण्याचा अंदाज आहे. सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता खूपच कमी असून, तापमान २८ अंशांपर्यंत खाली येईल, ज्यामुळे खेळाडूंना दिलासा मिळेल.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण १० सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये गुजरातने ७ सामन्यांत बाजी मारली आहे, तर राजस्थानला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. चालू हंगामात लीग स्टेजमध्ये दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते आणि दोघांनी १-१ सामना जिंकला होता. अहमदाबादमध्ये राजस्थानने ६ धावांनी विजय मिळवला होता, तर जयपूरमध्ये गुजरातने ७७ धावांनी राजस्थानचा धुव्वा उडवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.