Abhishek Sharma Statement: भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा याने 2025 या वर्षाचा शेवट ज्या धडाक्यात केला होता, अगदी त्याच आक्रमक अंदाजात त्याने 2026 या नवीन वर्षाची सुरुवातही केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात अभिषेकने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत कीवी गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये 84 धावांची तुफानी खेळी साकारली.
त्याच्या या खेळीत 5 प्रेक्षणीय चौकार आणि तब्बल 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताने हा सामना 48 धावांनी खिशात घातला आणि अभिषेकला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, या यशानंतर त्याने दिलेल्या विधानाची सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा होत असून त्याने आपला आदर्श म्हणून माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नाव घेतले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अभिषेक शर्माने अत्यंत प्रांजळपणे कबुली दिली की, तो भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित शर्माने देशासाठी जे योगदान दिले आहे ते अतुलनीय असल्याचे सांगत अभिषेक म्हणाला की, रोहित ज्या पद्धतीने भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन द्यायचा, ते आपण सर्वांनी पाहिले आहे.
जेव्हा अभिषेकची भारतीय संघात निवड झाली, तेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षकांकडूनही त्याची हीच अपेक्षा होती की त्याने पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उठवावा. सलामीला आल्यावर पहिल्या 6 षटकांत जास्तीत जास्त धावा कुटणे हे संघाचे मुख्य उद्दिष्ट असते आणि अभिषेक नेमकी तीच जबाबदारी चोख पार पाडत आहे. अभिषेकच्या मते, कोणत्याही संघाचे मुख्य गोलंदाज सुरुवातीच्या 3 षटकांत गोलंदाजी करतात, जर तिथे फलंदाजाने वर्चस्व गाजवले, तर संपूर्ण सामन्यात संघाला मोठी आघाडी मिळते.
अभिषेकने आपल्या फलंदाजीच्या रणनीतीबद्दलही सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला की, जर तुम्हाला 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करायची असेल, तर केवळ फटकेबाजी करुन चालत नाही, तर त्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक प्रतिस्पर्धी संघ सलामीवीरांविरुद्ध विशिष्ट योजना आखून मैदानात उतरतो. अभिषेकला याची पूर्ण जाणीव आहे की विरोधी संघ त्याच्या कमकुवत दुव्यांचा शोध घेत असतात. म्हणूनच तो सराव सत्रात अधिक मेहनत घेतो. गोलंदाज आपल्याविरुद्ध कुठे गोलंदाजी करु शकतो, याचा अंदाज घेऊन तो आपल्या शॉट्सचा सराव करतो. परिस्थितीनुसार स्वतःला सावरून घेत आक्रमक खेळ करणे हीच त्याची मुख्य ताकद ठरत आहे.
रोहित शर्माने भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये जी आक्रमकतेची संस्कृती रुजवली, तीच परंपरा आता अभिषेक शर्मा पुढे नेताना दिसत आहे. अभिषेकच्या या विधानावरुन हे स्पष्ट होते की, तो केवळ धावा काढण्यावर लक्ष केंद्रित करत नसून, रोहित शर्माप्रमाणेच संघाला निर्भय सुरुवात करुन देण्याला प्राधान्य देत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या विजयाने भारताने (India) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून अभिषेक शर्माचा हा फॉर्म आगामी सामन्यांमध्ये भारतासाठी विजयाची गुरुकिल्ली ठरु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.