गोव्यातील उन्हाळा सर्वांगाने सतावणारा असला तरी त्यावरील रामबाण उपाय देखील खरे तर आपल्या आजूबाजूला तत्पर असतात. समुद्रकिनारा आहे- जिथल्या पाण्यात डुंबून अथवा किनाऱ्यावरील एखाद्या सावलीत वारा अंगावर घेत आपण उष्णता विसरू शकता. उन्हाळ्याच्या मोसमात गोव्यातील बाजार मोसमी फळांनी बहरून गेलेला असतो.
आंबे, काजू, फणस, कलिंगडे, जांभळे, टरबूज, अननस, जाम, जगमे, करवंदे, तोरण आदी फळांचा आस्वाद घेता यावा यासाठी कित्येक जण उन्हाळ्याची वाटही पहात असतात. या फळांपासून तयार होणारी मधुर पेये तर उन्हाळ्यात सुख देणाऱ्या मायेच्या सावल्याच असतात.
उन्हाळ्यातील अशा सुखांचा अग्रदूत काजूचे फळ आहे. काजू फळापासून तयार होणाऱ्या हुर्राकाचे गुणगान कितीही गायले गेले तरी त्या फळांच्या चोथ्यापासून थेंब थेंब गोळा केलेला आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवून थंडगार केलेल्या 'निरो' नामक स्वर्गीय पेयाला उन्हाळ्यात दुसरा स्पर्धक नसेल. निऱ्याच्या दर घोटाबरोबर सुखाचा स्पर्श गळ्याकडून धावत पोटापर्यंत जाताना स्पष्ट जाणवतो.
काजूपासून बनणारे हे 'नॉन अल्कोहोलीक' पेय भर उन्हात शरीराला आणि मनाला ताजेतवाने बनवू शकते. शरीराला रिहायड्रेट आणि शांत करणारे हे पेय आहे. निऱ्यानंतर अर्थातच क्रमांक येतो हुर्राकचा. जंगल ज्यूस म्हणून ओळखले जाणारे अल्कोहोलिक पेय उन्हाळ्याच्या मोसमात गोव्यावर (राजकीय राजवट कोणाचीही असो) निरंकुश राज्य करत असते. लिम्का, थोडेसे मीठ, चिरलेली मिरची आणि हुर्राक याचे कॉम्बिनेशन गोव्यातील बार आणि रेस्टॉरंटमधील टेबलाटेबलांवर मजेत खिदळताना दिसते.
हुर्राक हा उन्हाळ्यातील पेयाचा तामसी प्रकार मानला गेल्यास कैऱ्यांपासून बनणारे पन्हे हे उन्हाळ्यातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे सात्विक पेय मानायला हरकत नसावी. शरीराला हायड्रेट ठेवणारे कच्च्या कैरीचे पन्हे हे एक उत्तम आणि पारंपारिक पेय आहे, जे चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. कच्च्या कैरीतील विटामिन सी आणि एंटीऑक्सीडेंटमुळे उष्णतेपासून रक्षण करत हे पेय शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.
त्याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसात अस्वस्थ होणाऱ्या पचनसंस्थेलाही मदत करणारे तसेच भूक भागवणारे हे पेय आहे. उन्हाळ्यात उपलब्ध असलेली विविध फळे मिक्सरमध्ये घालून त्यातून तयार झालेला रसदेखील उत्साहवर्धक असतो. कलिंगड, टरबूज, संत्री, अननस यांच्या रसप्राशनाने कसे छान वाटते.
नारळ आणि लिंबूपाणी ही उन्हाळ्यात शरीराला स्वस्थ ठेवणारी इतर पेये आहेत. नारळामधील पोटॅशियम किंवा लिंबूमधील विटामिन सी शरीराला मस्त जोपासतात आणि सर्वात लोकप्रिय उसाचा रस तर कोपर्याकोपऱ्यांवर खडी तालीम देत सज्ज असतो.
फळांच्या रसाव्यतिरिक्त ताक, थंड चहा ही पेये देखील उष्णतेवरचा हमखास उतारा आहेत. ताकामध्ये जिरे, पुदिना, काकडीचा कीस आणि मीठ घालून त्याची चव अप्रतिम सुधारता येते. ताकातील प्रोबायोटिक्स पचन सुधारण्यास मदत करणारे असते. चहा थंड करून त्यात बर्फ तसेच लिंबू, मध किंवा पुदिना घालून चवदार बनवता येतो.
विशेषतः ग्रीन आणि ब्लॅक टीमध्ये असणारे एल-थियानिन (एक प्रकारचे अमिनो आम्ल) शरीराला शांत करते आणि एकाग्रता वाढवण्यासही मदत करते. आणि अर्थातच पाण्यालाही आपण विसरू नये. तो तर गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असे कुठलेच भेदभाव न बाळगणारा, हाताशी असलेला त्वरित शोष-शामक उपचार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.