पणजी: पणजीचे गतवैभव पुनःप्राप्त करण्यासाठी आणि शहराचा ऱ्हास रोखण्यासाठी उत्पल पर्रीकर व अन्य नागरिकांनी एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले, तर काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभा संकुलात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावर प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रीकर यांनी सांगितले की, पणजी वाचवण्यासाठी जो कोणी पाठिंबा देईल, तो आम्ही आनंदाने स्वीकारू. पक्ष नव्हे, पणजीप्रेम हा एकमेव निकष आहे.
युरी म्हणाले की, राज्यातील लूट, भ्रष्टाचार, भू-माफिया, हफ्ता वसुली आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांना आळा घालण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. मुख्य विरोधी पक्ष म्हणून सर्व विरोधकांना एका व्यासपीठावर आणणे ही आमची जबाबदारी आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विरोधकांनी भाजप सरकारचा पर्दाफाश केला आहे.
२०२७ मध्ये काँग्रेस (Congress) सत्तेत येईल असा विश्वास युरी आलेमाव यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर जनतेला कोणते प्रकल्प हवेत आणि कोणते नकोत, हे ठरवण्याची संधी दिली जाईल. काँग्रेसने नेहमीच जनतेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. मात्र सध्याचे भाजप सरकार ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
पणजी ही गोव्याची राजधानी असूनही तिची सध्या दुर्दशा झालेली आहे. या शहराचा ऱ्हास थांबवण्यासाठी काही जागरूक नागरिक पुढे आले आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
पणजी महानगरपालिका निवडणूक ही पक्षीय नसून शहराच्या भवितव्याशी संबंधित आहे. गेल्या २५ वर्षांत झालेली प्रगती आणि मागील पाच वर्षांत झालेले अवमूल्यन जनतेने अनुभवले आहे. पणजी सुधारण्यासाठी मनपा हे प्रभावी माध्यम आहे. - उत्पल पर्रीकर, समाजकार्यकर्ते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.