सासष्टी : राज्य सरकारने गोमंतकीयांना अनुदानित दराने नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नारळ फलोत्पादन स्टॉलवर उपलब्ध करण्याचे सरकारने ठरविले आहे. एक नारळ ४५ रुपये दराने विकला जाईल. यासंदर्भात फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, की सरकारचा निर्णय चांगला आहे. पण अनुदानित दरात प्रतिनारळ ४५ रुपये हा दर स्वस्त आहे का?
सरदेसाई म्हणाले, की नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात मी हा विषय उपस्थित केला होता. नारळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे आवाहन केले होते. त्यानुसार सरकारने ही तजवीज केली आहे.
मात्र, ४५ रुपये हा दर जास्तच आहे. मी २०१८ साली सरकारात असताना २० रुपये दराने प्रतिनारळ विकला होता. प्रत्येक कुटुंबाला ३० नारळ देण्यात आले होते. पण गेल्या सात वर्षांत नारळ एवढा कसा महागला? मग डबल इंजिन सरकार काय करीत आहे? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला. सरकारने नारळाचे दर कमी करणे आवश्यक असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
‘कोकोनट एव्हेन्यू’मध्ये दोन्ही बाजूंनी मिळून ५६ माड लावले जातील. हे माड आंध्र प्रदेशमधून आणण्यात आले असून त्यांची देखभाल करण्यासाठी खास व्यक्तीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हे काम सात ते आठ महिन्यांत पूर्ण होईल. तोपर्यंत लोकांना थोडा त्रास सोसावा लागेल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.
फातोर्ड्यात कोलवा सर्कल ते कदंब बस स्थानकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरणाच्या कामांतर्गत ‘कोकोनट एव्हेन्यू’ उभारणीच्या कामाचा शुभारंभ आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. हे काम पर्यटन खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्वी गोव्यात दोन्ही बाजूंनी नारळाची झाडे असलेल्या भागाला ‘माडांनी’ असे म्हणायचे. अशाच प्रकारचा ‘माडांनी’ हा परिसर आम्हाला करायचा आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.