पणजी: एकेकाळी पर्यटकांच्या पसंतीस उतरणारे 'स्वप्नवत' गोवा आता आपल्या नैसर्गिक सौंदर्यापेक्षा वाढती महागाई आणि स्थानिक सेवा पुरवठादारांच्या उद्धट वागणुकीमुळे चर्चेत येत आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली असून, येथे येणारा प्रत्येक पर्यटक आता एकच प्रश्न विचारत आहे. "गोव्याला नक्की झालंय काय?"
गोव्यातील महागाईने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका पर्यटकाने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, ज्या कलिंगड ज्यूसची किंमत साधारणपणे ४० रुपये असायला हवी, त्यासाठी येथे २२० रुपये मोजावे लागत आहेत.
एवढेच नाही तर, साध्या बर्गरची किंमत ३५० ते ५०० रुपयांच्या घरात आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाला जर गोव्यात जेवायचे असेल, तर एका वेळेला किमान २००० रुपये खर्च करावे लागतात. संपूर्ण दिवसाच्या जेवणाचा खर्च ५००० रुपयांच्या वर जात असल्याने पर्यटकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे.
केवळ महागाईच नाही, तर गोव्यातील टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेल कर्मचारी आणि गाईड्स यांच्या वागणुकीबद्दलही पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांच्या मते, येथील सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये आपुलकीचा अभाव दिसून येतो. अनेकदा पर्यटकांना उद्धटपणाची वागणूक मिळते. "आम्ही पैसे देऊनही जर आम्हाला योग्य वागणूक आणि दर्जा मिळत नसेल, तर आम्ही पुन्हा इथे का यायचे?" असा सवाल अनेक कुटुंबांनी उपस्थित केला आहे.
एकेकाळी पाय ठेवायला जागा नसणारे गोव्याचे समुद्रकिनारे आता काहीसे ओसाड दिसू लागले आहेत. हॉटेल व्यवसायावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. वाढते दर आणि त्या बदल्यात मिळणारा सुमार दर्जाचा अनुभव यामुळे पर्यटकांची संख्या घटलीय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.