वाळपई: वाळपईतील प्रसिद्ध वेळूस पुलावर सोमवार (दि.४) दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. एका व्यक्तीने अचानक पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आणि जिवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसामुळे त्याचा जीव वाचला.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव कादर खान असून, तो वाळपई नगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवासी आहे. काही तांत्रिक कारणांमुळे त्याला मानसिक तणाव असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याने अचानक पुलावरून नदीत उडी घेतल्याचे पाहून परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. एका क्षणाचाही विलंब न करता, काही जागरुक नागरिकांनी तात्काळ वाळपई पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, बचाव पथकाच्या येण्याची वाट पाहण्यात वेळ नव्हता. नदीचा प्रवाह वेगवान होता आणि उडी घेतलेली व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत चालली होती. अशा परिस्थितीत, घटनास्थळी असलेल्या काही धाडसी स्थानिकांनी कोणतीही भीती न बाळगता थेट नदीच्या प्रवाहात उडी घेतली. यातील महेश गुरव नामक स्थानिक तरुणाने विशेष धाडस दाखवले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो प्रवाहात वाहत असलेल्या कादर खानच्या दिशेने पोहत गेला आणि त्याला पकडून मोठ्या कष्टाने बाहेर काढले. किनाऱ्यावरील इतर नागरिकांनीही त्याला बाहेर काढण्यास मदत केली. महेश गुरवच्या या समयसूचकतेमुळे आणि शौर्यामुळेच कादर खानचा जीव वाचू शकला.
कादर खानला बाहेर काढल्यानंतर थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी संतोष गावस यांनी या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत, महेश गुरव यांच्या धाडसी कार्याचे तोंडभरून कौतुक केले आणि अभिनंदनही केले. एका सामान्य नागरिकाने दाखवलेल्या या शौर्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.