पणजी: आता यंत्राच्या आधारे माडावर चढणे आणि नारळाची पेंड पाडणे होत आहे परंतु पूर्वी पाडेली माडावर चढून नारळाची पेंड पाडायचा त्यासोबतच माडाची सुई देखील साफ करायचा, परंतु आता यंत्राद्वारे नारळ पाडणाऱ्यांना सुई साफ करता येत नाही. त्यामुळे कीड लागून माड मरतो. पारंपरिक पाडेली घटल्याने नारळ उत्पादनावर घट होण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे कृषी अधिकारी दत्तराज देसाई यांनी सांगितले.
देसाई म्हणाले की, माडाची निगा राखण्यासाठी, त्यांना योग्यवेळी खतपाणी घालण्यासाठी आता मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. जर कामगार उपलब्ध असले तरी त्यांची मजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने माडांपासून मिळणारे उत्पादन आणि खर्च यांचा जम बसत नाही, असे त्यांनी सांगितले.
खोडातून रसस्राव होणे हे माड मरण्याचे आणि उत्पादन घटण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे रसस्राव होणाऱ्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावा व १–२ दिवसांनी कोलतार लावावी. प्रत्येक झाडाला मॅनकोझेब ५ ग्रॅम १०० मिली पाण्यात मिसळून मुळांमार्गे वर्षातून तीन वेळा (जून, ऑक्टोबर, जानेवारी) द्यावे.
जर खोडातून रसस्राव जास्त प्रमाणात होत असेल तर मॅनकोझेबचे प्रमाण वाढवा. या सोबतच झाडाला ५ किलो नीमखळी व ५० किलो सेंद्रिय खत द्या असे अनेक उपाय करता येतील. जर शेतकऱ्यांना काही समस्या जाणवत असतील तर त्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा. त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.
कीड लागून माड मरणे यातून जेवढे नारळ उत्पादन घटत नाही, त्यापेक्षा कित्येक पटीने माकड, खेती आणि शेकरू या वन्यप्राण्यांद्वारे पिकाची होणारी नासधूस अधिक घातक ठरत आहे. हे माकड अक्षरशः भाटात धुमाकूळ घालून पिकांची नासधूस करतात. वन्यप्राण्यांकडून नासधूस होण्याचे प्रमाण हे सांगे, धारबांदोडा, सत्तरी भागात अधिक असल्याचे देसाई यांनी सांगितले.
माडाचे नुकसान हे प्रामुख्याने माडाच्या सुईला, माडातून रसस्राव आणि कीड लागणे आदी प्रकारातून अधिक होते. यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. सुईला कीड लागण्यापासून बचावासाठी रोगट भाग काढून टाकून त्यावर कॉपर ऑक्सीक्लोराईड पेस्ट लावावी. पावसाळ्यापूर्वी काढणीच्या हंगामात मानकोझेब पावडर (५–१० ग्रॅम) भरून तयार केलेल्या टिश्यू पेपरच्या छोट्या पिशव्या पानांच्या बगलेत ठेवाव्यात जेणेकरून किडीपासून माडाची सुरक्षा करता येईल.
गोव्यातील नारळाच्या बागायती आजोबा, वडील यांच्या पिढीने तयार केल्या आहेत. माडाचे आयुर्मान ६० ते १०० वर्षे असते. परंतु, ७० वर्षांनंतर त्याच्याकडून उत्पन्न कमी मिळत जाते. इतर देशांमध्ये माडाचे आयुर्मान ६० वर्षांवर गेल्यानंतर त्याच्या बाजूला दुसरा माड लावला जातो. पाच ते दहा वर्षांनंतर नव्या माडापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर जुना माड कापला जातो. गोव्यात तसे होताना दिसत नाही.
राज्यात जमिनीचे दर, महागाई वाढत आहे. त्यामुळे जमीन विकत घेऊन नारळाच्या बागायती तयार करण्यास नवी पिढी तयार नाही.
माकड, रानडुक्कर, गवे आदी जंगली प्राण्यांमुळे नारळाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. माकडांमुळे तर ५० टक्के उत्पादन घटत आहे.
गेल्या काही वर्षांपासून नारळाला कीड लागत आहे. त्यामुळे त्याची वाढ होत नाही. परिणामी, अशा नारळांची विक्री होत नाही.
बागायतींत काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. किंबहुना माडावरून वेळेत नारळ उतरण्यासाठी पाडेली मिळत नाहीत.
– पूर्वीचे पाडेली माडावर चढल्यानंतर कीड वगैरे आढळून आल्यास तत्काळ त्याची माहिती शेतकऱ्यांना देत होते. तितका त्यांचा अभ्यासही होता. त्यामुळे शेतकरी तत्काळ उपाययोजना करून माड वाचवत होते. आताचे बहुतांशी पाडेली बाहेरच्या राज्यांतील आहेत. त्यांना याबाबतचा अभ्यास नाही. त्यामुळे अनेक ठिकाणचे माड मरून जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.