
पणजी: कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यांतून दररोज गोव्यात सुमारे ६० हजार नारळांची आयात होते, तर राज्यातील शेतकऱ्यांकडून ४० हजार नारळ मिळतो, अशी माहिती गोवा कृषी पणन मंडळाचे सचिव सत्यवान देसाई यांनी सोमवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
गोमंतकीय जनतेच्या दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेल्या नारळाचे राज्यातील उत्पादन विविध कारणांमुळे प्रत्येकवर्षी घटत चालले आहे. त्यामुळे गोव्याला नारळासाठी इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.
इतर राज्यांतून नारळाची गोव्यात आयात होत असल्यामुळे नारळाच्या दरात वाढ होऊन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागत आहे.
याबाबत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यात दररोज कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यांतून ६० हजार नारळ येतात. याशिवाय गोव्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे ४० हजार नारळ मिळतात. सद्यःस्थितीत राज्यातील बाजारपेठा, हॉटेल्सना दररोज एक लाख नारळाचा पुरवठा केला जातो, परंतु राज्याला दररोज किती नारळांची आवश्यकता आहे, याचा आकडा मात्र मिळू शकलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
गोव्यात माडावर पिकलेला नारळ वेळेत काढला जात नाही. त्यामुळे तो सुकतो. अशा नारळाचा तेल काढण्यासाठी वापर होत असून त्याची गोव्यातून गुजरातला निर्यात केली जात आहे. याशिवाय गोव्यातील नारळ महाराष्ट्रातील नाशिक, नागपूरमधील देवस्थानांनाही पुरवला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत राज्यातील नारळ बागायतींच्या क्षेत्रफळात वाढ झाली, परंतु पिकात मात्र मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
दुसऱ्या बाजूला उत्पन्नात मात्र प्रत्येक वर्षी घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. २०२२–२३ मध्ये राज्यात नारळाचे ६,११३ दशलक्ष नट्स इतके उत्पादन झाले होते. २०२३–२४ मध्ये त्यात घट होऊन ते ६,००६ दशलक्ष नट्स इतके झाले. तर, २०२४–२५ मध्ये त्यात आणखी घट होऊन उत्पादन ५,६२५ दशलक्ष नट्सवर आले. यातून तीन वर्षांत नारळाच्या उत्पादनात ४८८ दशलक्ष नट्सची घट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
मंत्री नाईक यांनी उत्तरातून २०२२–२३ ते २०२४–२५ अशी तीन वर्षांची आकडेवारी सादर केली आहे. त्यात २०२२–२३ मध्ये २६,६८३ हेक्टरवर नारळाच्या बागायती होत्या. २०२३–२४ मध्ये या क्षेत्रात वाढ होऊन ते २६,७८२ हेक्टर झाले, तर २०२४–२५ मध्ये त्यात आणखी वाढ होऊन ते २६,८०७ इतके झाले. यातून तीन वर्षांत नारळ बागायतींच्या क्षेत्रफळात १२४ हेक्टरने वाढ झाल्याचे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.